pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गरीबाचा पोरगा PSI झाला, गावकऱ्यांनी DJ लावून सत्कार केला; योगेश पैठणेच्या संघर्षाची कहाणी

स्पर्धा तीव्र टोकाला गेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षाच्या (मेन्स) इंग्रजीची तयारी करताना नाकी नऊ येते. शहरात शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही. त्यांच्या क्रमिक शिक्षणातच ते सर्व व्यवस्थित झालेलं असतं. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं बेसिकच गडगडलेलं असतं. पण तरीही अडचणींवर आणि समस्यांवर मात करत योगेश पैठणे फौजदार झाला.

0 1 7 4 0 8

काजळा (प्रतिनिधी) दि.16

काजळा : घेतलेला ध्यास तडीस नेण्यासाठी मेहनतीचे सातत्य आणि प्रचंड तळमळीची जोड ठेवत जिल्ह्याच्या काजळा गावचा योगेश निवृत्ती पैठणे हा १०२ व्या रँकने फौजदार झाला. पण त्याचं हे यश सोपं मुळीच नव्हतं.

गेल्या काही वर्षांपासून राज्यसेवा, स्पर्धा परीक्षांबद्दल गावामध्ये कमालीची नकारात्मक मानसिकता तयार झाली. गावातली पोरं आपली शेती करायचं सोडून शहरात जाऊन अभ्यास करतात. आणि ४ ते ५ वर्षे राहून कुठलाच कामधंदा न करता पुन्हा गावाकडे येतात, अशी धारणा ग्रामीण भागात झाली आहे. ती अजूनही टिकून आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ‘प्लॅन बी’ तयार नाही ते मग सपशेल अपयशाच्या गर्तेत जातात आणि मग गावातील लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. हा गावकरी वर्ग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सतत टोमणे मारताना, त्यांना हिणवताना दिसतो. पण अपयशाने न खचता MPSC मध्ये यश मिळवल्यावर योगेशच्या निवडीनंतर काजळा गावातील गावकऱ्यांनी डिजे लावून त्याची मिरवणूक काढली.योगेशच्या यशानं गावातली पोरं खरचं काही तरी करतात, याचं समाधान आता गावकऱ्यांना झालंय. गावकऱ्यांच्या टोकण्यापायी काही विद्यार्थ्यांनी गावात सण-उत्सवाला येणं बंद केलं आहे. नातेवाईकांना इच्छा असूनही फोनवर बोलणं बंद झालं आहे. त्यामुळे आपण गावकरी, नातेवाईक, समाज म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर कळत नकळत आघात होतेय. असं असतानाही योगेशने या सगळ्या परिस्थितीचा सामना केला आणि याशाला गवसणी घातली.

दहावी परीक्षेत मार्च २०११ मध्ये योगेशच्या बॅचचे ५२ पैकी १२ विद्यार्थीच पास झाले. त्यात बाराव्या नंबरवर योगेश होता. गणितात टॉप करणाऱ्या योगेशला १२ व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याची गुणांची टक्केवारी होती फक्त ४४ टक्के. यामागे बहुधा सुरेख व सुवाच्य हस्ताक्षर नसणं शिवाय लिहलेल्या उत्तरांची मांडणी व्यवस्थित नसणं ही कारणे असावी. मात्र हुशार असूनही हे त्याच्या वाट्याला आलें. पुढं बारावी कॉमर्स केल्यानंतर सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने पुढे क्लास सुरू केले. मात्र कालांतराने काही अडचणीमुळे त्याला हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुन्हा नव्याने तो नवीन क्षेत्राची चाचपणी करत होता. त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) तयारी करण्याचा बेत त्याचा होता. मात्र इथं वस्तुनिष्ठ प्रश्नासहित लिखित प्रश्नांना सामोरं जावं लागतं. परत तेच लिखाण आले. आणि अक्षरामुळे इथं आपला निभाव लागणार नाही म्हणून त्याने मग एमपीएससीची तयारी करण्याचं ठरवलं. सुरवातीला तयारी करण्यासाठी तो पुण्यात आला. पुण्यात वर्षभर काढल्यानंतर त्याला सूर गवसला. मात्र या दरम्यान अचानकपणे तब्येतीने साथ देणं सोडलं. बरेच दवाखाने पायाखाली घातले तरी गुण काही आला नाही. जेवण झाल्यावर उलट्या होण्याचा त्रास त्याला जडला. या आजारापायी पुणं त्याला कायमचं सोडावं लागलं. काही दिवस बरे गेल्यावर परत ह्या आजाराने डोकं वर काढलं मात्र, पठ्ठ्या हिंमतीने आणि जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहिला. आजार अंगावर काढत सातत्याने अभ्यास करत होता. होत असलेल्या त्रासापायी त्याला औरंगाबादही सोडावं लागलं.आजारामुळे त्याने कायमचं गावाकडे जाण्याचं ठरवलं होतं. कारण घरच्या जेवणामुळे त्याला हा त्रास होत नव्हता. गावाकडे आल्यावर अभ्यासासाठी तसं अनुकूल वातावरण नसल्याने अभ्यास कसा करायचा हे मोठं आव्हान समोर होतं. काही दिवस गावातून जालना शहरात एका अभ्यासिकेत जाऊन पोरगा पोटतिडकीने अभ्यास करू लागला. असा संघर्ष करत योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणारी PSIची पूर्व परीक्षा पास झाला. आता त्याच्या जबाबदारीत आणखीची वाढ झाली होती. मग त्याने दिनचर्या बनवत तिचे काटेकोरपणे पालन करण्याचे ठरवले.

जालना शहरात जाण्या-येण्यात जास्तीचा वेळ खर्च होतोय हे लक्षात आल्यावर त्याने गावाशेजारील माळरानावर, कधी घरी तर कधी गावातील अभ्यासिकेत जाऊन तयारी सुरू ठेवली. काटेकोर नियोजनाच्या बळावर तो पीएसआयची मुख्य परीक्षा (मेन्स) पास झाला. या दरम्यान तो सोशल मीडियापासून पूर्णपणे अलिप्त राहिला. आता पुढील टप्पा हा मैदानी चाचणीचा होता. अनेक वर्षांपासून फक्त अभ्यासातच गुरफुटून गेल्याने एकेकाळी धिप्पाड असलेल्या योगेशच्या शरीराला कसरत करण्याची सवय राहिली नव्हती. मग अशातच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना सोबत घेत आहारात, दिनचर्येत बदल करत मैदानी चाचणीत १०० पैकी ९७ गुण मिळवत तिथंही आपली चुणूक त्याने दाखवून दिली.

योगेशची एक सवय होती. दरवर्षी परीक्षा संपल्यावर तो साधारपणे १ महिना अभ्यासातून रजा घ्यायचा. या दरम्यान घरचे ट्रॅक्टर चालवणे, क्रिकेट खेळणे, मित्रांसोबत उनाडक्या करणे असे उद्योग त्याचे चालायचे. त्याच्या घरची हलाकीची परिस्थिती असल्याने त्याने मध्येच कायमची तयारी सोडून कंत्राटी पद्धतीने एका ठिकाणी नोकरी पकडली होती.

मी अधिकारी झालो म्हणून माझ्याकडे किंवा या क्षेत्रातील ग्लमर म्हणून बघू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजून घ्या.तयारी सुरू केल्यावर आपल्या मागील अपयशाचा विचार करू नका. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षे त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षांत आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडलं पाहिजे. शिवाय स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्यावा, असा सल्ला एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योगेशने दिला आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे