जालना जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प यात्रा” गावागावात जावून करतेय शासकीय योजनांची जनजागृती
जालना/प्रतिनिधी,दि.27
केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
गुरुवार, दि. 28 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा” – भोकरदन तालुक्यातील काठोरा जैनपूर व गोकुळ, बदनापूर तालुक्यातील अंबडगाव व धोपटेश्वर, अंबड तालुक्यातील सुखापूरी व लखमपूरी, घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव, जालना तालुक्यातील पसळखेडा/कैलासनगर व बोरगाव, परतूर तालुक्यातील ब्राम्हणवाडी व अकोली येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.