वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान

शहागड/तनवीर बागवान,दि.25
अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहु,हरभऱ्यासह मोसंबी,आंबा आदी फळबागांची मोठे नुकसान झाले आहे.उन्हाळी हंगामातील टरबूज खरबूज आदी पिके तर नेस्तनाबूत झाली आहेत.मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
वडीगोद्री परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व गारांसह तुफान गारपीट झाली.विजांचाही गडगडाट झाला.वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.परीसरातील अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून जनावरांना पण गारपीटीमुळे ईजा झाल्या आहेत.आधीच खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही आणि आता परत गारपिटीने रब्बी पिके नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री,सुखापुरी व गोंदी महसूल मंडळात तुफान गारपीट झाली.करंजाळा,पिठोरी सिरसगाव,घुंगर्डे हदगाव,वडीगोद्री,धाकलगाव,भणंग जळगाव आदी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहु आणि हरबरा तर मोसंबी, आंबा बांगांची फळगळ होऊन मोठे नुकसान झाले.
गारासह बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीके वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी धास्तावला असून काबाडकष्ट करून पिकवलेला गव्हू,हरभरा तसेच मोसंबी,डाळिंब,पपई,टरबूज आदी फळपिके मोठ्या प्रमाणात वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
प्रतिक्रीया.
१) माझे धाकलगाव शिवारात दोन एकर क्षेत्र असून गारपीट व अवकाळी पावसामुळे माझ्या अंजिराच्या बागेचे अतोनात नुकसान झाले असून याची शासनाने दखल घेऊन पंचनामा करावा.तसेच नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी….शिवाजी दुरांडे,शेतकरी,धाकलगाव
२) यावर्षी आस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत.निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी….सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना.