महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
जालना/प्रतिनिधी,दि.30
जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात दि. 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 13 मे रोजी मतदान होणार असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने जालना जिल्ह्यात राजकिय पक्षाच्या रॅली, प्रचार सभा, कॉर्नर बैठका, जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहेत. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको, ईत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत. आदेशात पाच (5) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलिस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या पनवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. 1 मे 2024 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 मे 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.