छत्रपती संभाजीनगर-जालना-परभणी रेल्वेमार्ग अखेर दुहेरी ट्रॅकवर !
माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश
जालना/प्रतिनिधी,दि.1
मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या या सुमारे १७7.29 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी केंद्राने तब्बल २,179 कोटी (अक्षरी-रूपये दोन हजार एकशे एक्याऐंशी कोटी) रुपये इतका निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, आणि नांदेड या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे केवळ प्रवासी रेल्वेच नव्हे तर मालगाड्यांची वाहतूक सुद्धा अधिक वेगाने आणि अचूक वेळापत्रकानुसार होईल. हा संपूर्ण मार्ग वर्ष २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
या प्रकल्पामुळे अनेक फायदे होणार आहेत. मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक असल्याने शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीत मोठी क्रांती घडेल. नागपूर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या मोठ्या औद्योगिक संकल्पनांना या मार्गाचा मोठा फायदा होईल. शिवाय, लॉजिस्टिक्स पार्क, कोल्ड स्टोअरेज, गोदामे, आणि नवीन उद्योगांना चालना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पामध्ये माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मोलाचा वाटा आहे. रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने दिल्लीमध्ये रेल्वे मंडळ आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. विविध बैठकींमध्ये त्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि मंत्रालयाचे लक्ष या गरजेच्या दिशेने वेधले. त्याचं फलित म्हणजे आज केंद्र सरकारने मोठ्या निधीसह या प्रकल्पास मान्यता दिली आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर केवळ रेल्वे प्रवासच सुकर होणार नाही, तर मराठवाड्यातील संपूर्ण आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ही घडामोड म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या दूरदृष्टीचा आणि लोकहिताच्या बांधिलकीचा ठोस परिणाम आहे.
यामुळे माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक जनप्रतिनिधींपर्यंत अनेकांनी त्यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि परिणामकारक निर्णयक्षमतेचे कौतुक केले आहे. मराठवाड्याच्या प्रगतीस चालना देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. त्यांच्याकडे विकासाभिमुख, लोकहितवादी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.



