शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण पिक पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक समृध्दी साधावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना/प्रतिनिधी,दि.10
भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबुन आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीत प्रचलित पिकांऐवजी अधिक उत्पन्न देणाऱ्या पिक पद्धतीचा अवलंब करुन अधिकाधिक आर्थिक समृद्धी साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या वतीने राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सहाय्य (आत्मा) नियामक मंडळाच्या आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीस आत्मा प्रकल्प संचालक ए. के. आगवान, जिल्हा रेशीम अधिकारी ए. पी. मोहिते, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. बी. बनसावडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जालना जिल्ह्याची ओळख ही बियाणांची राजधानी म्हणून सर्वत्र आहे. मात्र अजूनही शेतकरी प्रचलित पद्धतीने जी पिके घेतली जातात त्याचीच शेती करतात ज्यामुळे त्यांना उत्पन्न व मोबदला कमी मिळतो. जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत रेशीम शेती मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत मात्र प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त नफा देणारे रेशीम शेती, मशरूम शेती, चिया सिड्स, पांढरी मुसळी, ड्रॅगन शेती करण्याकडे भर द्यावा, असे त्या म्हणाल्या.
जिल्हा रेशीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक यांनी जिल्ह्यातील परतुर व बदनापूर या दोन तालुक्यांचा समावेश आकांक्षी तालुके म्हणून करण्यात आलेला या दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. आत्मा योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये राबविण्यात येणाऱ्या मुख्य बाबींमध्ये सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करण्यावर भर देणे, सन 2025-26 मध्ये टोकन पद्धत, जोडओळ पद्धत, बीबीएफद्वारे विना अनुदानित तत्वावर सोयाबीन पिक प्रात्यक्षिके राबविणे, ड्रोन यंत्राद्वारे पिक फवारणी प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेती / नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यास बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सोयाबीन बिजोत्पादनासाठी विना अनुदानित तत्वावर शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहित करणे, चालू वर्षी नव्याने 200 शेतकरी गट स्थापन करण्याचे नियोजन त्यापैकी आज अखेर 124 शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना योग्य पिक पद्धतीचा अवलंब करणेबाबत मार्गदर्शन करणे सुरू आहे, एसआरटी तंत्रज्ञान पद्धतीने कापूस लागवड करावी जेणेकरून कापूस उत्पादन वाढेल, दादा लाड तंत्रज्ञान पद्धतीने कापूस लागवड, धान्य प्रक्रिया व फळप्रक्रिया माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पिकांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत नियोजन असल्याबाबतची माहिती आत्मा प्रकल्प संचालक ए. के. आगवान यांनी दिली.

