संकुचित वृत्ती सोडून व्यापक होणे म्हणजे परमार्थ – डॉ प्रमोद महाराज कुमावत

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
आयुष्यभर ईश्वरसेवा करून शेवटी परब्रम्ह परमात्मा पांडुरंगाची भेट झाली, तसेच सर्व मागील दू:खाचा नाश झाला तरच परमार्थ पूर्ण झाला आहे असे समजावे. माणूस विचाराने संकुचित वृत्तीचा झाला म्हणून तो लहान झाला. वृत्तीला व्यापक करणे म्हणजे परमार्थ होय असे प्रतिपादन परतुर येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताहात बोलताना वेदांताचार्य हभप डॉ प्रमोद महाराज कुमावत यांनी केले.
संसारातील दुःखाची निवृत्ती कितीही केली तरी ती अत्यांतिकनिवृत्ती नसते तर संसारात दुःख हे पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. अज्ञानासहित संसार दुःखाची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती होय व सत्यज्ञानानंदस्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीत खरे समाधान आहे. परमात्म्याचे स्वरूप व्यापक आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्या ठायी रूप वर्ण गुण नाहीत. हे धर्म स्थूल देहाचे आहेत असे ते म्हणाले.
सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण।
नाहीं रुप वर्ण गुण जेथे ॥१॥
तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी ।पाहते पाहणें दुरी सारोनिया ॥२॥ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योती ।ते हे उभी मूर्ती विटेवरी ॥३॥ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांनी निरूपण केले. दोन लक्षणांद्वारे परमात्म्याची निरूपण केले जाते एक तटस्थ लक्षण व दुसरे स्वरूप लक्षण. या अभंगांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू पण लक्षणाद्वारे परमात्म्याची ओळख करून दिलेली आहे. परमात्म्याच्या व्यापकत्वाला जाणल्याने मनुष्य व्यापक वृत्तीचा होत असून वृत्ती शून्य ब्रह्म स्थितीला तो प्राप्त होत असतो त्यामुळे संकुचित विचाराला टाकून देऊन व्यापक विचाराला धारण केले पाहिजे श्रवण मनन निदिध्यासन करून परमात्म्याची प्राप्त करून घेणे हा परम पुरुषार्थ होय असे ते म्हणाले.
यावेळी हभप डॉ वामनराव वैद्य गुरूजी, सोपान महाराज सांगुळे, बाबुराव महाराज मगर,भागवत महाराज काकडे, तुळशीदास महाराज, नामदेव शास्त्री, ॲड महेश उफाड,जगन वायाळ आदी परीसरातील भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



