आज परतवाडा सभेत आक्रमक उद्धव ठाकरेंच्या तोंडी शेरोशायरी यशोमती ठाकूर यांच्या प्रचारात शायराना अंदाज,
शिवसेना उबाठा कडून वचननामा जाहीर वचनाम्यात आश्वासनांचा पाऊस,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.7
तिवसा, अमरावती : विरोधकांवर कायम आक्रमक शैलीत आणि ठाकरी भाषेत टीकेचे बाण सोडणारे उद्धव ठाकरे अमरावतीत मात्र वेगळ्यात रंगात दिसून आले. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघातल्या प्रचार सभेला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी यशोमती ठाकूर यांचे महाविकास आघाडी सरकरमधील काम आणि त्यांच्या कामाच्या शैलीचे उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच २५ वर्षे जुन्या साथीदाराने युती तोडली पण कायम प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काँग्रेसनेच्या दु:खाच्या वेळी खंबीर साथ दिल्याचे सांगत त्यांनी शेरोशायरी ऐकवली.
तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. यशोमती ठाकूर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी आक्रमक अंदाजातील उद्धव ठाकरे यांचा शायराना अंदाज बघायला मिळाला.
लहानपणापासून मला शेर बघायची सवय आहे. त्यामुळे शायरी माझ्यापासून लांब राहिली.पण “सुख मे जो साथ देते है वो रिश्ते होते है, और दुख में जो साथ देते हो फरिश्ते होते है” असे म्हणत शिवसेना फुटीच्या कठीण काळात काँग्रेसच्या साथीबद्दल उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून आभार मानले.
उद्धव ठाकरेंची ‘ही’ सवय सुटली नाही, वचननाम्यावरून भाजपचा टोला
संकाटात साथ दिलेले तुम्ही सगळे फरिश्ते आहात.. अशा शायरीने उद्धव ठाकरे यांनी भाषण सुरू केले. मी सगळ्यांकडून ऐकले की यशोमती ठाकूर खूप आक्रमक आहेत, बोलू देत नाहीत. मविआ सरकारच्या काळात यशोमती ताईंकडे महिला आणि बालकल्याण खाते होते. विदर्भाचा विषय आला, महिलांचा विषय आला की यशोमतीताई भांडून हक्काच्या गोष्टी घेत असे. ताई कुणाचे ऐकत नाही, फक्त माझे ऐकते…. तिच्यासाठी खास म्हणून मी तिवसा मतदारसंघात आलो. सत्ता येते जाते पण नाती महत्त्वाची असतात, सत्ताच येणारच आहे, जाते कुठे? असे उद्धव म्हणाले.
पैशांनी माल विकला जातो, माणसे विकली जात नाही. माझे आजोळ अमरावतीचे परतवाडा आहे. आमच्यावर संस्कार चांगले आहेत, त्यांच्यावर भाजप संस्कार झालेले नाहीत म्हणून ते काहीही बोलू शकतात. देशात न्यायाचा बाजार मांडलेला आहे. न्यायदेवतेबद्दल आदर आहे, मात्र लोकशाहीचा खून होत आहे. माझ्यासमोर बसलेली ही माझी जनता न्यायदेवता आहे. संविधानात लिहिल्याप्रमाणे हे लोक वागत नाही. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही, असे ठाकरे म्हणाले.