pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

0 3 2 5 7 3
जालना/प्रतिनिधी, दि.6
‘मी शब्दांना असे घुसळले की, रक्तामधुनी काव्य उसळले
बहुदा तिचीच चाहूल आहे,  हवेत अत्तर कसे मिसळले.
गझलेच्या वस्तीत राहतो, मी माझ्याच मस्तीत राहतो,
आज काल मी सुगंध होऊन, रसिकाच्या दस्तीत राहतो.’ असे म्हणत प्रसिद्ध गझलकार योगीराज माने यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
 जेईएस महाविद्यालयाचा मराठी विभाग तसेच भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद, शाखा जालना यांच्या वतीने आयोजित केलेल्या सातव्या  त्रैभाषिक गझल मुशायर्‍या मध्ये उपस्थित गझलकारांनी एकापेक्षा एक सरस गझला सादर केल्या.
           मुशायऱ्याचे उद्घाटन छत्रपती  संभाजीनगर येथील मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माजी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. अपर्णा पाटील, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या गझल मुशायर्‍यात राजेंद्र अत्रे, योगिराज माने, युवराज नळे, जमाल चिस्ती, भागवत घेवारे आणि सुनीता कपाळे या नामवंत गझलकारांनी आपल्या रचना सादर केल्या. गझल मुशायर्‍याचे अध्यक्ष डॉ. इक्बाल मिन्ने यांनी ‘सबको सबकी हर खबर चाहिए , लोग चलती फिरती अखबार क्यूँ है |’अध्यक्ष स्थानावरून याप्रमाणे एकापेक्षा एक सरस गझला सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले.
         धाराशिव येथून सहभागी झालेल्या भागवत घेवारे यांच्या ‘पायाखालची घेतील काढून तुझ्या, ते वीट विठ्ठला, जरी वाटले भोळेभाळे, लक्ष ठेव तू नीट विठ्ठला.  या भावगर्भ मराठी गझलेने गझल मुशायऱ्याचा प्रारंभ झाला.
‘गुरू कोण असतो मुक्या पाखरांना, तरी जाहली ती कलाकार आता’. या छ. संभाजीनगर येथील गझलकारा सुनीता कपाळे यांनी तरन्नूम मध्ये सादर केलेल्या गझलेने श्रोत्यांना अंतर्मुख केले. तर ‘मुह  से निवाला न छीनो गरीबों के, इसी कारण फसाद होना है मंजूर|
बूढों के कुछ हाल देखकर ‘रौशन’, बिलकुल बेऔलाद होना है मंजूर|’ या हिंदी गझलेतून
धाराशिव येथील युवराज नळे यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. असेच वास्तव भाष्य छ. संभाजीनगर येथील उर्दू गझलकार जमाल चिस्ती यांनी ‘न डालो यु ही कुछ शक की निगाहे, मेरे झोली मे कोई बम नही है |या  दमदार गझलेतून केले.
‘इथे ना तोतयी तत्वे, इथे ना बेगडी वस्त्रे, तरीही वीज सत्त्याची, उराशी लावतो आम्ही’.
 असे म्हणत धाराशिव येथील राजेंद्र अत्रे यांनी वर्तमान वैचारिक चळवळीचा, चळवळीतील निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या नेत्यांचा आपल्या गझलेतून चांगलाच समाचार घेतला. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या मुशायऱ्याचे डॉ. शेख इकबाल मिन्ने यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. यशवंत सोनुने यांनी केले, तर भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेची भूमिका जिल्हाध्यक्ष डॉ. सत्यशीला तौर यांनी मांडली. कार्यक्रमासाठी डॉ.  शिवाजी हुसे, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. के.जी. सोनकांबळे, भगवानराव डोंगरे, कॉ.अण्णा सावंत, डॉ. सुहास सदाव्रते, डॉ.भगवानसिंह डोभाळ,डॉ. उमेश मुंढे,डॉ. राजेंद्र सोनवणे,डॉ. एफ. एम. मोहिते, डॉ. बी.जी. श्रीरामे, प्रा. उद्धव बिन्निवाले, डॉ. बाबासाहेब वाघ आदीसह शहरातील प्रसिद्ध नागरिक तसेच भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एकनाथ शिंदे यांनी केले तर आभार प्रा. बाबासाहेब खंडाळे यांनी मानले. तांत्रिक बाजू  डॉ. वसंत उगले व श्रीनिवास सैंदर यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे