जालना जिल्ह्यात 9 व 12 मे रोजी यलो अलर्ट विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.9
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 9 व 12 मे 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. दि. 9 मे रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, गारांसह सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) पावसाची शक्यता वर्तवली आहे, दिनांक 12 मे रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची व ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
वरील पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरीकांना पुढीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, घातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा.
दरम्यान, दिनांक 8 मे रोजी भोकरदन तालुक्यातील मौजे चोराळा येथे एक गाय, मौजे अव्हाना येथे एक गाय, मौ. मुठाड येथे एक बैल तर मौजे पिंपळगाव रेणुकाई येथे एक गाय अशा एकूण चार जनावरांचा वीज पडून मृत्यु झाला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.