बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 11
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार सन २०२४ साठी केंद्र शासनाने अर्ज मागविले असून अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुकांनी गुरुवार दि.31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एम.चिमंद्रे यांनी केले आहे.
बाल शक्ती पुरस्कार हा ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षांपर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर बालकल्याण पुरस्कारात वैयक्तिक पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावरावरील बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.