टेंभुर्णी : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना निरोप देताना ग्रामस्थ
मनातील वेदना दूर सारून पोलीस समाजासाठी कार्यतत्पर : मुकुंद आघाव

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.26
मनातील वेदना दूर सारून पोलीस समाजासाठी 24 तास कार्य तत्पर असतात यामुळेच सुदृढ व सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होते हेच काम दोन वर्षाच्या कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी केल्याने टेंभुर्णीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले असे प्रतिपादन भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना बदली निमित्त मंगळवारी (ता.२५) निरोप देण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख आतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ तर प्रमुख पाहुणे म्हणून भागवत वाघ यांची उपस्थिती होती.
सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती पाहता साध्या तक्रारीसाठीही येणारे राजकीय फोन व दबावात पोलिसांना काम करावे लागत असले तरी ही कसरत श्री ठाकरे यांनी कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने हाताळली यामुळेच ग्रामस्थांचे प्रेम त्यांना मिळाले असल्याचे श्री आघाव यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री ठाकरे यांना निरोप समारंभाच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने चांदीचा रथ भेट देण्यात आला तर येथील ग्राम संसद कार्यालय व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री ठाकरे यांचा गौरव केला.
24 तास राबणाऱ्या वर्दीतील पोलिसांच्या वेदनाही जाणून घेतल्या पाहिजेत. चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना ग्रामस्थ चांगले फळ देतात असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळताना वाद होणार नाही यासाठी प्रयत्न केले व त्यामध्ये यश आले. या सोबतच गुन्ह्यांचा आले वाढणार नाही यासाठी आपण विविध गुन्हेगारांना वेळेत जेरबंद केले. या कामी टेंभुर्णी सह परिसरातील ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना सांगितले. सूत्रसंचालन वसुंधरा भांडेकर यांनी केले.