संपूर्ण देशात आपण जिथे जातो तिथे केवळ पद द्या अशी मागणी होते. मात्र पाच वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार असलेल्या रावसाहेब दानवे यांनी आपल्या भागाचा विकास केला असून सहाव्या वेळेस दानवेंना विजयी करा जालन्याला सर्व क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे नेतील. असे जाहीर आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रचार सभेत केले.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी ( ता. 08) डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अति विराट महाविजय संकल्प सभा संपन्न झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे, ना. डॉ.भागवत कराड, खा.अजित गोपछडे, पालकमंत्री अतुल सावे, शिवसेना उपनेते ,माजी मंत्री, अर्जुनराव खोतकर ,माजी आमदार हरिभाऊ बागडे, अरविंदराव चव्हाण, विलासराव खरात, आ.संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे, रिपाइंचे चे मराठवाडा अध्यक्ष ॲड.ब्रह्मानंद चव्हाण, उद्योजक घनश्यामदास गोयल ,संजय केनेकर,ओमप्रकाश चितळकर, भाऊसाहेब घुगे, गजानन गीते, राजेश राऊत, इद्रिस मुलतानी, एजाज देशमुख, भास्करराव पाटील दानवे, भाऊसाहेब घुगे, बद्रीनाथ पठाडे ,सुहास शिरसाठ, संजय केनेकर ,विश्वास पाठक, अशोक अण्णा पांगारकर, संध्याताई देठे, विमलताई आगलावे, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, विजय कामड आदींची उपस्थिती होती.सभेस उपस्थित हजारोंच्या जनसमुदायास संबोधित करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजुरेश्वर गणपती, दुर्गा माता ,मम्मदेवी, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा जनार्धन मामा, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या निवडणुकीत दोन पर्याय जनतेसमोर असल्याचे सांगून देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो हे जनतेने अनुभवले आहे. मागील दहा वर्षात इंडिया आघाडीतील भ्रष्ट नेत्यांकडील 12 लाख कोटींचे घोटाळे उघडकीस आले असून गर्मी वाढल्यावर बँकॉकला जाणारे राहुल बाबा हवेत की 23 वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता भारत मातेची सेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा विचार जनतेने करावा असे सांगून जालनेकारांनी दानवेंना कमळासमोर दिलेले प्रत्येक मत हे नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवेल अशी साद अमित शाह यांनी घातली.
कोरोना काळात नरेंद्र मोदी हे जनतेचे जीव वाचवत असताना कोविड रुग्णांच्या खिचडीतून उद्धव ठाकरे मलाई खात होते असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.छत्रपती संभाजी नगर नावाच्या प्रस्तावास उद्धव ठाकरे हे स्वागत सुद्धा करू शकले नाही ते ज्या आघाडीत गेले आहेत त्यांना श्रीराम मंदिर,370 कलम, तीन तलाक नको तर शरीयत च्या आधारावर देश चालवायचा आहे. तो खरच चालू शकेल का असा सवाल उपस्थित करत पाकिस्तानातून राहुल गांधी यांचे समर्थन वाढल्याचे अमित शाह यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी दहशतवादी, नक्षलवादी , यांचा बिमोड करत देशाला सुरक्षित आणि जगात उच्च स्थानी नेऊन ठेवले आहे.
त्यांच्याजवळ मागील दहा वर्षांचा हिशोब आणि 25 वर्षांचा अजेंडा पण असल्याचे सांगून जगात भारताला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन होण्यासाठी आणि पाकिस्तानला गोळीचे प्रतिउत्तर गोळीने देण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले तथापि इंडिया आघाडीच्या दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर महाराष्ट्राला नऊ लाख 80 हजार कोटींचा निधी दिला असून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प दिल्याचे सांगून विरोधकांकडे विकासाचे धोरण कार्यक्रम नाही अशी टीका त्यांनी केली. शेवटी उपस्थितांना ना.दानवे यांच्या विजय संकल्प ची वज्र मुठ बांधा असे आवाहन ना. अमित शाह यांनी केले.यावेळी पालकमंत्री अतुल सावे, माजी आ. अरविंदराव चव्हाण ॲड. ब्रह्मानंद चव्हाण,राजेश राऊत, ओमप्रकाश चितळकर,सुहास शिरसाठ, एजाज देशमुख, बद्रीनाथ पठाडे, यांची समायोचित भाषणे झाली.
सूत्रसंचालन शर्मिष्ठा कुलकर्णी देशपांडे यांनी केले तर सिद्धिविनायक मुळे यांनी आभार मानले. यावेळी महिला तरुण महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
_________
चौकट
रेकॉर्ड तोडून निवडून येतील : फडणवीस
दिवसभर कडक उन्हाच्या झळा असलेल्या सभास्थळी थंडावा पसरला वातावरणात निर्माण झालेला गारवा पाहून “अमित भाई आनेसे माहोल बदल गया है! ” असे सूचक विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेस उपस्थित जनसमुदायाची संख्या पाहून पहिल्यावर मनात कसलीच शंका नाही रावसाहेब दानवे हे जालनाच नव्हे मराठवाड्याची शान असून शेतकरी ,शेतमजूर ,सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत .ते यावेळी सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येतील. असा तुर्दम्य विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. समृद्धी महामार्गामुळे जालना आणि छत्रपती संभाजी नगर ही शहरे मॅग्नेट सिटी म्हणून उदयास येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पुढील काळात पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
_________
चौकट
विरोधक अस्थिर तर भाजप स्थिर:ना.दानवे
नेता आणि निती नसलेले विरोधक हे विना चेहऱ्याची निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने आतापर्यंत देशात अस्थिरता पसरवली असून भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार दिले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दुर्दम्य आशावाद ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
__________
चौकट
ही तर विजयी सभा : माजी मंत्री खोतकर
ना. रावसाहेब पाटील दानवे आणि आपल्या मधील मतभेद निवडणुकीच्या आड येणार नाहीत याची जाहीर कबुली देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनवर आमचं सगळं मिटल आहे .असे सांगून उपस्थित जनसमुदायाच्या दिशेने पहात ही प्रचार नव्हे तर विजयाची सभा असल्याचे शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी याप्रसंगी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला असून आपल्यावर टाकलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही .अशी ग्वाही खोतकर यांनी याप्रसंगी दिली.