गायरान जमिनीच्या वादातून “वंचित”च्या पदाधिकाऱ्याचा चुलत्याकडून निर्घृण खून रामनगर (सा. का.) शिवारात शनिवारी रात्री घडली घटना
विरेगाव/गणेश शिंदे, दि.16
जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव (वय 33) आणि त्यांचे चुलते निवृत्ती आढाव यांच्यामध्ये रामनगर शिवारातील गायरान जमिनीचा वाद सुरू आहे.
या वादातून शनिवारी रात्री संतोष आढाव यांच्यासह त्यांचा भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे यांच्यावर रात्री चुलत्यासह पाच जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि दगडांनी हल्ला केला.
यावेळी झालेल्या बेदम मारहाणीत संतोष आढाव हे जागीच ठार झाले आहेत.
तर त्यांच्यासोबतचे भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे (मंजरेवाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे, राकेश नेटके यांच्यासह पोलिसांच्या फौजफाट्याने तातडीने घटनास्थळ गाठले.
जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात संतोष आढाव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून निवृत्ती पाराजी आढाव यास ताब्यात घेतले आहे.
जखमी संजय आढाव यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती आढाव, त्याचा मुलगा योगेश आढाव, वंदना आढाव, दीपक जाधव आणि चुलत बहीण स्वाती हिचा नवरा, अशा पाच जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.