महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश जारी
जालना/प्रतिनिधी,दि.18
दि. 21 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती व दिनांक 23 एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती उत्सव साजरा होणार असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध संघटनांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्हयात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको, ईत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याअर्थी अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे पाच (5) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाईचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दिनांक 17 एप्रिल रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 30 एप्रिल 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.