मे. बजेट सीएफएस(cwc) कंपनीतील काम करत असलेले पागोटे, पाणजे कामगारांनी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत घेतली पत्रकार परिषद.
कोणत्याही कामगारांनी कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण करू नये अन्यथा उपोषण कर्त्यांच्या विरोधात कंपनीतील कामगार घेणार आक्रमक भूमिका.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29
उरण तालुक्यात पागोटे ग्रामपंचायत हद्दीत बजेट सी. एफ. एस. द्रोणागिरी ही कंपनी कार्यरत असून या कंपनीत १५० कामगार काम करीत आहेत.ज्यांच्या जमिनी या कंपनीसाठी संपादित झाल्या आहेत असे पागोटे, पाणजे गावातील स्थानिक कामगार काम करीत आहेत.मात्र या कंपनीत आम्हालाही कामाला घ्यावे अशी मागणी इतर गावातील नोटीस घेतलेले बेरोजगार कामगार करीत आहेत.नोटिस घेतलेले बेरोजगार कामगारांनी २० नोव्हेंबर २०२३ पासून साखळी उपोषण सुरु केले होते. कंपनीचे काम आता कुठे तरी सुरू झाले असताना बेरोजगार कामगारांमार्फत सुरू असलेले हे साखळी उपोषण चुकीचे आहे.असे उपोषण करणे म्हणजे कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक भूमीपुत्र जमीनधारक प्रकल्पग्रस्तांच्या पोटावर पाय देण्यासारखे आहे. कंपनीच्या गेट समोर उपोषण करणाऱ्या कामगारांमूळे कंपनीच्या व्यवहारावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी कंपनी बंद होईल त्यामूळे कंपनीतील काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेउन कंपनीच्या गेट समोर कोणत्याही कामगारांनी, बेरोजगारांनी कंपनीच्या गेट समोर कोणतेही आमरण उपोषण करू नये, आंदोलन करू नये अन्यथा कंपनीत काम करणारे सर्व कामगार आक्रमक भूमिका घेतील असा इशारा कंपनीत काम करणारे जमीनधारक प्रकल्पग्रस्तांनी उपोषण कर्त्यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे.
काही बेरोजगार कामगार पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील बजेट सी. एफ.एस द्रोणागिरी या कंपनीच्या गेट समोर दिनांक २० नोव्हेंबर २०२३ पासून साखळी उपोषण करीत आहेत.मात्र या साखळी उपोषणाने कंपनीत काम करणाऱ्या व स्थानीक प्रकल्पग्रस्त असलेल्या कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे . त्यामूळे कोणत्याही कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर साखळी उपोषण, आमरण उपोषण करू नये. आमरण उपोषण करून कंपनी प्रशासनाला वेठीस धरू नये. हे सांगण्यासाठी कंपनीत कार्यरत असणाऱ्या कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या विविध समस्यांना वाचा फोडली.
कंपनीतील कामगारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कंपनीत काम करणारे कामगार अरुण पाटील यांनी सांगितले की सि. डब्लू.सी. पागोटे, ता. उरण, या कंपनीत काही वर्षांनंतर जागे झालेल्या कामगारांचा साखळी उपोषण व वस्तुस्थिती वेगळी आहे.कोरोन काळात कंपनी बंद होती त्यानंतर मे. शुभम एच. पी. सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंत्राटदाराने हे काम घेवून १०६ कामगार कामावर घेवून कंपनी सुरु केली. त्यावेळी १०६ कामगार कमी पगारात काम करत होते. त्यावेळी हे उपोषण करणारे कामगार कमी पगारामुळे कामावर आले नाहीत. दोन वर्षानंतर या कंत्राटदाराला बिझनेस नसल्यामुळे नुकसान सहन न झाल्यामुळे त्यांनी काम सोडले नंतर कंपनी तीन वर्ष बंद होती. आत्ताचा कंत्राटदार मे. बजेट सि.एफ.एस. या कंत्राटदाराने पागोटे ग्रामस्थांबरोबर कामगारांबरोबर तसेच मुळ मालक सीडब्लू सी यांच्याबरोबर तसेच तत्कालीन युनियन न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना यांच्याबरोबर चर्चा करून कंपनी सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली असता कामगारांनी सर्वत्तोपरी मदत करू पण कंपनी सुरु करा अशी विनंती केली. मे. बजेट सि.एफ. एस. कंत्राटदाराने कामगारांनी तसेच पागोटे गावाने सहकार्य केल्यास कंपनी सुरु करण्याचे आश्वासन दिले व कंपनी अथक परीश्रमाने सुरु झाली.त्यामुळे १०६ कामगारांच्या घरातील चुली पेटल्या व कामगारांना रोजगार मिळाला त्यावेळी आत्ता उपोषणास बसलेले कामगार कंपनीकडे ढुंकूनही पाहायला आले नाहीत कुठेतरी कंपनी स्थिर होत असतांना आत्ता या कामगारांना जाग आली व ते उपोषणास बसले आहेत.त्यामुळे आधीच नुकसानीत चालवत असलेल्या कंपनीच्या बिझनेसवर परिणाम होवून कंत्राटदार मानसिक तणावाखाली गेले आहेत. त्यांनी जर अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला तर १५० कामगारांवर पुन्हा उपासमारीची वेळ येईल जर असे झालेच तर आम्ही १५० कंपनीत काम करत असलेले कामगार उपोषण कर्त्या कामगारांचे नेतृत्व करणारे भूषण पाटील, संतोष पवार, सुधाकर पाटील यांच्या घरावर मोर्चा नेतील याची नेत्यांनी नोंद घ्यावी. कंपनी व्यवस्थापन यांनी पोलीस ठाणे उरण येथे उपोषण कर्त्या कामगारांना दिलेल्या लेखी प्रस्ताव मान्य करून सहा महिने बिझनेस वाढ होण्याची वाट पाहायला हरकत नव्हती परंतु काहींच्या आडमुठ्या धोरणामुळे चर्चा फिसकटली, जर उपोषण कर्त्यां कामगार किंवा त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमुळे हि कंपनी बंद पडली तर आतील काम करणारे कामगार स्वस्थ बसणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी असा आक्रमक इशारा पत्रकार परिषदेतून अरुण पाटील यांनी उपोषण करणाऱ्या बेरोजगारांना व संतोष पवार, भूषण पाटील, सुधाकर पाटील या नेत्यांना दिला आहे.
पागोटे येथे बजेट सीएफएस द्रोणागिरी कंपनी समोर आम्ही कोणालाही उपोषण आंदोलन करू देणार नाही.आणि कोणी आंदोलन, उपोषण केला तर त्याला आम्ही जाहिरपणे विरोध करू.जर कोणी आमरण उपोषण केले किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीस तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कामगार नेते भूषण पाटील,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार हेच जबाबदार राहतील असे मत कामगार विश्वजीत ठाकूर यांनी व्यक्त केले.तर जर कोणी आंदोलने उपोषणे केली तर सुधाकर पाटील, संतोष पवार, भूषण पाटील यांना जबाबदार धरून त्यांच्या घरावर मोर्चा काढू अशी माहिती दमयंती नरेश पाटील यांनी दिली.कंपनीच्या वाईट काळात कंपनीत कार्यरत असलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी कंपनी सांभाळली आहे.कोरोना काळात कामगारांनी जीव धोक्यात घालून दररोज काम करून कंपनी चालू ठेवली आहे.मात्र काही बेरोजगार कामगारांनी कामावर घ्यावे म्हणून उपोषण सुरु केले आहे.हे उपोषण करणारे कामगार एवढे दिवस कुठे होते.कामगार कोरोना काळात कुठे होती ? कंपनीचा वाईट काळ सुरू होता तेव्हा ही लोक कुठे होती ? उपोषण करणाऱ्या कामगारांचा बजेट सि. एफ. एस.प्रशासनाशी कोणताही संबंध नाही. २० कोटीचा लॉस असूनही कंपनी कार्यरत आहे. कंपनीमूळे आम्हाला रोजगार मिळाला आहे आणि मिळत आहे.तो रोजगार आमच्याकडून हिसकावून घेवू नका अशा तीव्र शब्दात कामगार प्रदिप पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी अरुण पाटील, विनायक पाटील, पंढरीनाथ पाटील, विश्वजीत ठाकूर, प्रदीप पाटील, चंद्रहास तांडेल, पुंडलिक पाटील, सुधाकर पाटील, आशा भोईर, रेश्मा भोईर आदी स्थानिक जमीन धारक प्रकल्पग्रस्त कामगार उपस्थित होते.
बजेट सीएफएस द्रोणागिरी पागोटे कंपनीत कामावर कार्यरत असलेले कामगार व कार्यरत नसलेले कामगार यांच्यात नोकरीवरून वादविवाद सुरू आहेत. या नोकरीच्या समस्येवरून उरण पोलिस ठाणे, कंपनी प्रशासन, कामगार, उपोषणकर्ते कामगार यांच्यात संयुक्त बैठकाही झाल्या मात्र यातून झालेली चर्चा उपोषणकर्त्या कामगारांच्या आडमुठे धोरणामुळे निष्फल झाली आहे . त्यामूळे हा वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.४ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे कामगार आयुक्त येथे कामगारांच्या समस्यावर बैठक होऊन या महत्वाच्या समस्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपोषण करणारे कामगार व कंपनीत काम करणारे कामगार या सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहेत.