पत्रकारांच्या समस्या नियमानुसार सोडविण्यास प्राधान्य – उपसंचालक प्रवीण टाके
जालना/प्रतिनिधी,दि.8
बदलत्या माध्यमविश्वात पारंपरिक पत्रकारितेसोबतच डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्यांवर नियमानुसार योग्य कार्यवाही करून त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी दिली.
उपसंचालक प्रवीण टाके यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे जालना जिल्ह्यातील पत्रकार व संपादकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, सहायक संचालक सुरेश पाटील यांच्यासह विविध दैनिके, साप्ताहिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील प्रलंबित प्रकरणे, अधिस्वीकृती पत्रिका, शासकीय कार्यक्रमांचे पास, जाहिरातींचे वितरण, तसेच शासकीय बातम्या व माहितीच्या वितरणातील समन्वय याबाबत सूचना व अपेक्षा मांडल्या.
यावेळी श्री. टाके यांनी पत्रकारांच्या सूचना व समस्यांची नोंद घेत संबंधित प्रकरणांची नियमानुसार तपासणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. शासकीय कार्यक्रमांसाठी माध्यम प्रतिनिधींना आवश्यक समन्वय साधण्यात येईल. जाहिरातींचे वितरण शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात येते. स्थानिक माध्यमांना नियमांच्या चौकटीत आवश्यक सहकार्य मिळण्यासाठीही समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
माहिती कार्यालय आणि पत्रकार यांच्यातील संवाद अधिक सुसूत्र करण्यासाठी माहिती वितरणाची प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. पत्रकारांच्या प्रश्नांवर नियमितपणे चर्चा व्हावी, यासाठी भविष्यात अशा समन्वय बैठका घेण्यात येतील, असेही श्री. टाके यांनी सांगितले.
प्रारंभी पत्रकारांच्या वतीने सुयोग खेर्डेकर यांनी उपसंचालक प्रविण टाके यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

