भोकरदन तालुक्यातील करजगांवच्या दोन रस्त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट दर्जाची; 1 जुलैपासून बोर शे गुरुजींचे करजगांव येथे आमरण उपोषण!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
भोकरदन, दि. 04 जून 2026: भोकरदन तालुक्यातील 1) सुरंगली ते जळगांव सपकाळ व 2) 2) करजगांव ते कोकडी फाटा या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असून झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कडुबा विनायकराव बोरशे (बोरशे गुरुजी) यांनी केला आहे. याबाबत बोरशे गुरुजी यांनी आज दि. 04/06/2026 रोजी जिल्हाधिकारी, जालना यांना आमरण उपोषणाची पूर्वसूचना नोटीस दिली आहे. सदर नोटीस मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, SDO, तहसीलदार व पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आली आहे. नागरिकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष: बोरशे गुरुजी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खालील गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत: 1. दोन्ही रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून अर्धवट बंद आहेत. 2. नुकतेच केलेले डांबरीकरण जागोजागी उखडले असून मोठमोठे खड्डे पडत आहेत. 3. रस्त्याच्या बर्ममध्ये ( पंख्यामध्ये ) शासकीय नॉर्म्सप्रमाणे मुरूम न भरता काळी माती भरली आहे. सुरंगली-जळगांव रस्त्यावर बर्मचे ( पंख्याचे) काम केलेलेच नाही. 4. कामाच्या ठिकाणी कोणतेही माहिती फलक नसल्याने योजना, निधी, गुत्तेदार व जबाबदार अधिकारी यांची माहिती नागरिकांपासून लपवली जात आहे. बोरशे गुरुजींचा आरोप: “सदर कामे इस्टिमेट व शासकीय नॉर्म्सप्रमाणे झाली नसल्याचा दाट संशय आहे. कामे पूर्ण न होताच गुत्तेदाराला बिले अदा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी केलेल्या तोंडी व लेखी विनंत्यांना केराची टोपली दाखवली आहे,” असे बोरशे गुरुजी म्हणाले. मागण्या व अल्टिमेटम: बोरशे गुरुजी यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत: 1. दोन्ही रस्त्यांची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत तात्काळ चौकशी करावी. 2. कामे इस्टिमेट व नॉर्म्सप्रमाणे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत. 3. दोषी गुत्तेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार फौजदारी कारवाई करावी. 4. कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याचे आदेश द्यावेत. दि. 17/06/2026 पर्यंत चौकशी सुरू करून लेखी कळवावे. अन्यथा दि. 01/07/2026 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालय, करजगांव येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणास बसणार. होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाची राहील,” असा इशारा बोरशे गुरुजी यांनी नोटिशीद्वारे दिला आहे.
