जिद्द आणि मेहनतीचा विजय. सातेफळच्या अर्जुन माळीची पोलीस दलात भरारी.
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.23
जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ येथील गरीब कुटूंबातील जिद्दी आणि होतकरू अर्जुन माळी या तरुणाने पोलीस दलात निवड मिळवत गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अगदी लहानपणापासून अर्जुन माळीने देशसेवेची प्रबळ इच्छा मनात ठेवून गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी दीर्घकाळ कठोर मेहनत घेतली.पहाटेच्या थंडीत धावण्याचा सराव, दिवसभर लोकांची रॊजमजुरी अन रात्री उशिरापर्यंत अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता.अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि स्पर्धेचे आव्हान असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीच माघार घेतली नाही.
या यशामागे कुटुंबियांचा मोठा आधार लाभला.आई वडील व भाऊ यांनी दिलेले प्रोत्साहन,आणि स्वतःची चिकाटी यामुळेच त्यांनी हे स्वप्न साकार केल्याचे अर्जुन माळी ने सांगितले. पोलीस दलात निवड झाल्याने गावातील नागरिकांनीही या तरुणांचे जल्लोषात स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
या निवडीमुळे सातेफळ गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. गावातील इतर युवकांनाही यामुळे नवी प्रेरणा मिळाली असून त्यांनीही पोलीस दलात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.”कष्ट आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,”असा संदेश या यशातून मिळतो.
पोलीस दलात निवड झालेल्या या तरुणांकडून भविष्यात प्रामाणिकपणे व निष्ठेने कर्तव्य पार पाडले जाईल,अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
अर्जुन माळी ची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ऍड रामकृष्ण बनकर यांनी सहकुटुंब अर्जुन व आईचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी नादखेडचे सरपंच बाबासाहेब सवडे, देराजा येथील व्यापारी अनिल पवार दीपक माळी, अनिल माळी यांची उपस्थिती होती.
चौकट:-
परिसरातील युवकांनी आदर्श घ्यावा.
ऍड.रामकृष्ण बनकर.
जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ येथील गरीब व रोजमजुरी करणाऱ्या कुटूंबातील या तरुणाने ध्येय उराशी बाळगून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. परिसरातील युवकांनी अर्जुन माळी चा आदर्श बाळगून मार्गक्रमण करावे, सतत मेहनत करावी अपयश आले म्हणून खचून जाऊ नये, उलट जोमाने कामाला लागावे




