टेंभुर्णीच्या विकासासाठी आलेला करोडो रुपयाच्या निधी गेला कुठे?
सात लाखाची व्यायाम शाळा,रोड नाल्या गायब. ऐतिहासिक ग्रामसभेत विकासाचे शेकडो प्रश्न. महिलांचा मोठा सहभाग.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
ग्रामसभेसाठी तरुणांनी उपोषण करून उभी केलेली ग्रामसभेला मोठी गर्दी लाभली होती.येथील शुभम मुळे यांनी ग्रामसभा गावात घेण्यासाठी उपोषण केले होते. सतत सोशल मीडियावर पोस्ट आणि योग्य पाठलाग करून त्यांनी ही ग्रामसभा आणली होती.
गावच्या विकासासाठी आलेला कोट्यावधी रुपयाचा निधी गेला कुठे असा संताप सवाल करीत ग्रामपंचायतीचा मागील पाच वर्षाचा पूर्ण लेखाजोखा आमच्यासमोर सादर करा अशा अनेक प्रश्नांनी टेंभुर्णीची ग्रामसभा वादळी ठरली.
मंगळवारी गावातील मध्यवस्तीत असलेल्या चमनवर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम विस्तार अधिकारी बळीराम वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व विस्तार अधिकारी व्ही.टी. जायभाये यांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत गावातील युवकांनी गावातील समस्यांचा अक्षरशः पाढाच वाचला. ग्रामसभेच्या प्रारंभी गावात नव्याने मंजूर झालेल्या 836 घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. यातून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनीही 8 दिवसाच्या आप आपले प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावे असे सांगण्यात आले. यावेळी गावात व्यायामशाळाच्या नावावर लाखो निधी खर्च केला गेला असताना प्रत्यक्षात मात्र ही व्यायाम शाळाच अस्तित्वात नसल्याचा संतप्त आरोप तरुणांनी केला. याशिवाय टेंभुर्णी गाव नगरपंचायतीसाठी पात्र असल्याने त्वरित ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे असा ठरावही मांडण्यात आला. याशिवाय खडकपूर्णा पाणीपुरवठा योजनेची चौकशी करणे, गावांतर्गत नाल्या व खराब झालेले रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामपंचायत कार्यालय गावात स्थलांतरित करणे, पोस्ट ऑफिस सह सर्व राष्ट्रीयकृत बँका जुन्या गावात आणणे, बाहेरून जाणाऱ्या सर्व एसटी बस गावात आणणे, पाळणा घराची चौकशी करणे, देशी दारू व बार ची दुकाने बंद करणे, बाजार हाराशी गावातील व्यक्तीलाच देणे आदी जवळपास 42 मुद्दे या ग्रामसभेत मांडण्यात आले. यावेळी महिलांनीही मोठी उपस्थिती दाखवीत अनेक प्रश्न उपस्थित केले.ग्रामसभेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशन तर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
———————————————————————
गावातील बस प्रश्न गावातील बसस्थानक प्रश्न नाली समस्या त्याची न होणारी साफ सफाई, रोड वरील घाण,अस्वच्छता, गावातील खराब रोड,गावात मुलासाठी महिलांसाठी स्वच्छता गृह, गावात मुख्य वस्तीत आवश्यक असलेले लाईट, बाजार स्थळी कायम असलेली घाण,नळाला 20 / 25 पाणी नाही, खडकपुर्णा ची अधुरी पाईप लाईन त्यांची खोटी आश्वासन, गावच्या अतिक्रमण प्रश्न,त्यावर तोडगा काढण्याची कमी मानसिकता,नियोजन शून्य कारभार,करोडो रुपायाचा निधी येत असुन ग्रामपंचायत च्या कर्मचारी यांचा पगार नाही. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियावर आणि विकास निधीच्या ऍप वरुण दिसणारे करोडो रुपये अखेर गेले कुठे असा प्रश्न या वेळी तरुणांनी विचारलेला प्रश्न आणि त्यांवर न भेटलेले उत्तर या वर विशेष ही ग्राम सभा गाजली. या वेळी महिलांचे तरुणाचे विशेष सहभाग होता हे विशेष.




