आषाढी वारी व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

जालना/प्रतिनिधी, दि.3
आषाढी वारी तसेच आगामी गणेशोत्सवासारख्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांची भेट घेतली. शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर तेघबीरसिंग संधू यांनी कर्तव्यदक्ष व संवेदनशील कार्यपद्धतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. विशेषतः जालना शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी कालावधीत सुरळीत केल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या कामकाजाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. शिष्टमंडळाने आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन करण्याची मागणी केली. काही वर्षांपूर्वी पायी वारी करणाऱ्या यात्रेकरूंच्या दिंडीचा अपघात झाल्याची आठवण करून देत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी आगामी गणेशोत्सव, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यासंदर्भात शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांच्याशी सविस्तर चर्चा केली.



