जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड
जालना/प्रतिनिधी,दि.21
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षात ‘राज्य पुरस्कृत योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण तसेच विविध कृषी विषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत एकूण 5 शेतकऱ्यांची लक्षांकित निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून 14 ऑगस्ट, 2026 रोजी पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली असून, जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.
ही सोडत 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.
