उरण-द्रोणागिरीत ‘सबवे’ झाला ‘तरण तलाव’, रुळावरून जीवघेणा प्रवास

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
उरण मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील द्रोणागिरी आणि उरण या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले आहे. आज सकाळी ९: ४७ ची लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना सबवेमधून फलाटावर जाता आले नाही. त्यामुळे नोकरदार, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून थेट रेल्वे रुळावरून कसरत करत स्थानक गाठावे लागले. स्थानिक प्रवाशांनी सांगितले की, २०२४ मध्ये लोकल सेवा सुरू झाल्यापासून दर पावसाळ्यात या दोन्ही स्थानकांच्या भुयारी मार्गात पाणी भरते. गेल्या वर्षीही हीच परिस्थिती होती. या प्रकाराबाबत स्टेशन मास्तरांना विचारले असता पाऊस जास्त झाल्याने पाणी साचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उरण परिसर खाडी व पाणथळ भागात असल्याने बांधकाम करताना पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था केली होती का, असा सवाल नागरिक करत आहेत. “सकाळी ऑफिसला जाताना सबवेत पाणी भरलेले असते. रुळावरून जाणे धोकादायक आहे,” असे द्रोणागिरी येथील प्रवासी नितीन पाटील यांनी सांगितले. महिला व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास होत आहे. स्थानकांची नावे चुकीची असल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे. त्यातच ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी २०२० मध्येच खारफुटी व पाणथळ जागा बुजवून स्थानक बांधल्यास पावसाळ्यात पाणी भरणार, असा इशारा दिला होता. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवणे, ड्रेनेज दुरुस्ती करणे व भुयारी मार्गाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे. अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागेल, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.



