मेरखेडा येथे खरीप हंगाम पूर्व तयारी व शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न
उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया आणि हुमणी व्यवस्थापन काळाची गरज - --आर. डी. मालवी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.12
जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ‘शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप पूर्व तयारी, बियाणे निवड आणि सुधारित तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. श्री अमोल शिंदे तालुका कृषी अधिकारी व अनिल शेळके मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आर डी मालवी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “हवामान बदलाच्या काळात शेती फायदेशीर करायची असेल, तर केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता तांत्रिक बाबींची जोड देणे आवश्यक आहे. विशेषतः सोयाबीन पिकाची पेरणी करताना घरच्याच बियाण्याला प्राधान्य द्यावे आणि त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी.” मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे: बीजप्रक्रिया मोहीम: मर रोग आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी ‘एफ.आय.आर.’ (बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणू खते) पद्धतीने बीजप्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले. हुमणी अळी नियंत्रण: पावसाच्या पहिल्या सरीनंतर प्रकाश सापळे लावणे आणि यजमान झाडांवरील भुंगेरे नष्ट करणे यावर भर देण्यात आला. खत व्यवस्थापन: जमिनीचा पोत ओळखून संतुलित खतांचा वापर करावा आणि अनावश्यक खर्च टाळावा, अशा सूचना श्री. मालवी यांनी दिल्या. पेरणीची घाई नको: जमिनीत किमान ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय आणि पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. या मेळाव्याला मेरखेडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.



