जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.28
‘महाराष्ट्र दिन’ 1 मे रोजी जालना जिल्हा स्थापनेला 45 वर्ष पुर्ण होत आहे. या अनुषंगाने जालना जिल्हा प्रशासनामार्फत ‘रायझिंग जालना’ हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन जालना शहरातील अग्रसेन भवन येथे करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. ‘रायझिंग जालना’ सोहळ्यामध्ये जालना जिल्ह्याच्या मागील 45 वर्षांच्या वाटचाली अनुषंगाने आयोजित प्रदर्शनी मध्ये जालना जिल्ह्याच्या विशेष बाबींवर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध विभागांचे उल्लेखनीय काम स्टॉलच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असुन, यात विविध बचत गटांच्या स्टॉलचा देखील समावेश राहणार आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.




