शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या लक्कडकोट चौकातील एका जमिनीच्या वादावरून आता मोठा संघर्ष उभा ठाकला आहे. ही जमीन कायदेशीररित्या आपलीच असतानाही, काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तेथील फलक आणि बॅनरची तोडफोड केली असून, यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप संजय कटके यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रसंगो जयश्री कटके यांना अश्रू अनावर झाले असून त्यांनी आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचेही सांगितले.
नेमका प्रकार काय?
लक्कडकोट चौकातील संबंधित जमीन जयश्री कटके यांनी खरेदी केलेली असून, भूमी अभिलेख कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंतच्या सर्व शासकीय कागदपत्रांवर मालक आणि कब्जेदार म्हणून त्यांचेच नाव आहे. पीआर कार्डवरही त्यांचीच नोंद आहे. असे असतानाही, शुक्रवारी (दि. १०) काही समाजकंटकांनी या जागेवरील गेटचे बोर्ड तोडले आणि बॅनर फाडून टाकले. हा सर्व प्रकार सुनील राठी व अनिल मालपाणी यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा आरोप कटके यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न?
पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय कटके म्हणाले की, जालना तहसीलदारांच्या आदेशाला सुनील राठी व अनिल मालपाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयात आपला ताबा सिद्ध करण्यासाठी सुनील राठी व अनिल मालपाणी हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “आमचा या जागेवर १९७४ पासून ताबा आहे, अगदी लाईट बिल सुद्धा आमच्याच नावे आहे. सर्व चौकशीत ही जागा आमचीच असल्याचे स्पष्ट झाले असतानाही न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पोलीस प्रशासन आणि राजकीय दबावाचा आरोप
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या तोडफोडीबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. यात एका बड्या राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असून, त्या व्यक्तीकडून कटके कुटुंबाला धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “एका राजकीय व्यक्तीने मालपाणी यांना ३ कोटी रुपये द्या, म्हणजे जमीन तुमचीच राहील, असा प्रस्ताव दिल्याचे” धक्कादायक विधानही यावेळी करण्यात आले.
जयश्री कटके यांना अश्रू अनावर
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या जयश्री कटके अत्यंत भावूक झाल्या होत्या. “मी माझी आयुष्यभराची पुंजी आणि माझ्या लग्न झालेल्या मुलींचे दागदागिने विकून ही जमीन खरेदी केली आहे. आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून मला, माझ्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचा धोका निर्माण झाला आहे,” असे सांगताना त्यांना रडू कोसळले. न्याय हक्कासाठी लढत असताना प्रशासन आणि राजकारणी एकत्र येऊन छळ करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लक्कडकोट चौकातील या जमिनीच्या वादामुळे जालन्यात सध्या तणावाचे वातावरण असून, आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.