युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष्यांसाठी मातीच्या पाणपोई उपक्रमास सुरुवात

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र उन्हाळ्याची लाट जाणवत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. या कडक उन्हामुळे माणसांबरोबरच मुक्या पक्ष्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी चिमण्या, कबुतरे, कावळे, साळुंकी, बुलबुल यांसारखे पक्षी तहानेने व्याकुळ होत आहेत. काही पक्ष्यांचा जीवही जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. नैसर्गिक पाणवठे कमी झाल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मानवाने झाडे कमी केली, जागा कमी केली, पाणी कमी केले… आणि मग आश्चर्य व्यक्त करतो की पक्षी कुठे गेले. या पार्श्वभूमीवर युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहर, गाव व परिसरांमध्ये पक्ष्यांसाठी मातीची पाणपोई (मातीचे भांडे) लावण्याच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत झाडांखाली, सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात, इमारतीजवळ, उद्यानांमध्ये व पक्ष्यांची वर्दळ असलेल्या भागात मातीची भांडी ठेवून त्यात स्वच्छ पाणी भरले जात आहे. या उपक्रमामुळे पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध होणार असून उन्हाळ्यात त्यांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहे. मातीच्या भांड्यातील पाणी थंड राहते, त्यामुळे पक्ष्यांना नैसर्गिक व सुरक्षित पाणी मिळते. तसेच पर्यावरण संवर्धन, जैवविविधता जपणे आणि प्राणी-पक्ष्यांप्रती दया व संवेदनशीलता वाढविण्यास हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. संस्थेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात किंवा दुकानासमोर एक मातीचे भांडे ठेवून दररोज स्वच्छ पाणी भरावे. छोटासा प्रयत्न अनेक जीवांचे प्राण वाचवू शकतो. मोठमोठे विचार करणाऱ्यांनी कधी कधी एक वाटी पाणीही ठेवावे. युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून पर्यावरण, प्राणी संरक्षण, शिक्षण, सामाजिक मदत व जनजागृती अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. समाजहिताचे उपक्रम राबवून राज्यभर सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य संस्था करत आहे. युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश बनकर म्हणाले, “माणुसकी फक्त माणसांसाठी नसते, ती प्रत्येक सजीवासाठी असते. आज एका पक्ष्याची तहान भागवली, तर उद्या निसर्ग आपल्याला आशीर्वाद देईल. प्रत्येक घरासमोर एक पाणपोई ठेवली, तर हजारो जीवांना जीवनदान मिळू शकते. समाजाने पुढे येऊन या सेवाकार्यात सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे




