मुक्ताई दिंडीचे आमदार अर्जुनराव खोतकर व संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्याकडून स्वागत!
जालना/प्रतिनिधी,दि.04
मुक्ताईनगर येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या दिंडीचे जालना जिल्ह्यात आगमन होताच जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांनी पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी दिंडी प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिंडीचा जालना जिल्ह्यातील मुक्काम आणि प्रवास सुरळीत पार पडावा, यासाठी सर्व मुक्कामस्थळी सुव्यवस्था राखण्याच्या सूचना व आवश्यक निर्देश आमदार अर्जुनराव खोतकर यांनी प्रशासनाला दिले. दिंडीतील सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था ज्ञानेश्वर खरात यांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच रविवारी सकाळी शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केले.

