पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता; हाता-तोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती

काजळा/प्रतिनिधी, दि.31
काजळा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काजळा परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसटून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतातील पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून उभी केलेली पिके पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
“आशेने पीक उभं केलं; आता फक्त पावसाची गरज आहे. पाऊस झाला नाही तर हाता-तोंडाशी आलेला घासही हातातून निघून जाईल,” अशी व्यथा चिंताग्रस्त शेतकरी सरदार नूरभाई सय्यद, काजळा यांनी व्यक्त केली.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाने लवकर हजेरी लावावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.




