कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (WDC) आणि श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयक जनजागृती, आरोग्य-स्वच्छता, सकारात्मक दृष्टिकोन आणि सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना मासिक पाळीविषयी शास्त्रीय व योग्य माहिती देणे, स्वच्छतेच्या सवयींबाबत जागरूक करणे तसेच आरोग्यविषयक गैरसमज दूर करून आत्मविश्वास वाढविणे हा होता.
कार्यक्रमासाठी डॉ. दया परदेशी (B.A.M. S., M.D. (Ayu), PGDEMS, DYA, आयुर्वेदिक कन्सल्टंट), डॉ. निशा ओव्हाळ (होमिओपॅथी कन्सल्टंट) आणि श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगिता ढेरे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीशी संबंधित आरोग्य, स्वच्छता आणि आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन केले. मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य आरोग्यविषयक माहितीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. ए. आर. कांबळे तसेच WDC सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व सहकारी प्रा. वाणिज्य विभागप्रमुख व्ही. एस. इंदलकर यांनीही विद्यार्थिनींना आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन केले.
‘माहितीपूर्ण महिला, निरोगी महिला आणि सक्षम महिला’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविण्यात आला. महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर खुलेपणाने चर्चा होणे आणि वैज्ञानिक माहिती उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत डॉ. हन्नत शेख यांनी केले, तर आभार विनिता तांबे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या सदस्यांसह श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या कविता म्हात्रे, मीना रावल व शबाना खान आदी उपस्थित होते.
मासिक पाळीविषयी जनजागृती ही केवळ आरोग्याची नव्हे, तर महिलांच्या सन्मान, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचीही बाब आहे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.