अंधश्रद्धा आणि बुवाबाजी : बुद्ध विचारांची गरज – दारोकार गुरुजी.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
आजच्या विज्ञानयुगात माणूस चंद्रावर पोहोचला, तंत्रज्ञानाच्या मदतीने जग जवळ आले; पण तरीही समाजातील अंधश्रद्धा आणि बुवाबाजी पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. उलट काही ठिकाणी त्या अधिकच बळावताना दिसतात, ही चिंतेची बाब आहे. दारोकर गुरुजी आपल्या मार्गदर्शनात सांगतात की, अंधश्रद्धा म्हणजे विचारशक्तीला न जुमानता कोणत्याही गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवणे होय. अशा अज्ञानाचा फायदा घेऊन काही भोंदू लोक स्वतःला ‘बाबा’, ‘गुरु’ म्हणून सादर करतात आणि लोकांची फसवणूक करतात. हीच बुवाबाजी समाजासाठी घातक ठरते. याच ठिकाणी भगवान बुद्ध यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. बुद्धांनी कधीही अंधानुकरणाला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की — “कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने, ऐकून किंवा कोणीतरी सांगितल्यामुळे स्वीकारू नका; ती स्वतःच्या बुद्धीने तपासा.” बुद्धांचा “अप्प दीपो भव” हा संदेश माणसाला स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याची प्रेरणा देतो. त्यांनी तर्क, अनुभव आणि प्रज्ञा यावर भर दिला. त्यामुळे बुद्धधर्म हा अंधश्रद्धेचा नाही, तर विवेक आणि विज्ञानाचा मार्ग आहे. आज अनेक लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर, तज्ज्ञ किंवा योग्य मार्गदर्शकांकडे न जाता बुवाबाजीकडे वळतात. यामुळे त्यांचे आर्थिक, मानसिक नुकसान होते. काही वेळा तर अशा अंधविश्वासामुळे जीवितहानीही होते. दारोकार गुरुजी पुढे सांगतात की, खरा धर्म माणसाला मुक्त करतो, भीतीमध्ये ठेवत नाही. जो धर्म भीती निर्माण करतो, तो खरा धर्म नसतो. बुद्धांनी दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगितला, भीती निर्माण करणारा नव्हे. समाजातील प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. मुलांना प्रश्न विचारायला प्रोत्साहित केले पाहिजे. शिक्षणातून विवेक, मानवता आणि समता या मूल्यांची जोपासना केली पाहिजे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेश सदावर्ते, कोषाध्यक्ष अरुण वाघमारे, उपाध्यक्ष कुणाल दहिवले, माधव पात्रे, संघटक शेषराव सोनवणे, तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, संदीप इंगोले, अशोक गंगावणे, चंद्रकांत वाघमारे, संभाजी कांबळे, कुलदीप गरड, गणपत भद्रे पर्यटन मंत्री, गुमनराव पारखे ,प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के, राहुल वाकडे, महेंद्र शिंदे, प्रमोद गायकवाड, प्रकाश मगरे सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते.
