‘धन-दौलत नव्हे,बुद्धाचा धम्मच सुख-समृद्धीचा खरा मार्ग!’-भाई सुधाकर निकाळजे
पापळ येथे माता रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिमाखात अनावरण

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
“जगात धन-दौलत नव्हे, तर बुद्धाचा धम्मच तुम्हाला सुख,समृद्धी, शांती आणि समाधानाकडे नेऊ शकतो. त्यामुळे बौद्धांनी धम्मकार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे,” असा घणाघाती संदेश जयभीम सेना संस्थापक अध्यक्ष भाई सुधाकर निकाळजे यांनी दिला.
श्रावस्ती पौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून जाफ्राबाद तालुक्यातील पापळ येथे माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण बुद्ध भिक्षुणी आर्याजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई सुधाकर निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यामुळे पापळ परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले.
रमाईंच्या त्यागाला पुतळ्याच्या रूपाने अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी माता रमाईंचा पूर्णाकृती पुतळा असावा आणि त्यांच्या त्याग,संघर्ष,समर्पण व समाजाप्रती असलेली आत्मसमर्पित भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम साकारण्यात आला.
धम्माचा प्रचार व प्रसार करताना प्रतिग्रहणातून प्राप्त झालेल्या धम्मदानरूपी रकमेतून बुद्ध भिक्षुणी आर्याजी यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जन्मस्थळी आर्थिक सहकार्य करून पुतळा उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे हा पुतळा केवळ स्मारक न राहता धम्म,त्याग आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणास्तंभ ठरला आहे.
‘शील-सदाचार-करुणेच्या मार्गाने चला!’
भाई सुधाकर निकाळजे यांनी आपल्या भाषणात शील,सदाचार आणि करुणेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. राजकीय,सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक निर्णय घेताना सद्बुद्धीचा वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
देशातील सध्याची राजकीय व धार्मिक परिस्थिती पाहता बौद्ध समाजाने धम्मकार्यात अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी बुद्धाच्या धम्माची जीवनाला दिशा देणारी शक्ती स्पष्ट केली.
‘रमाई नसत्या तर बाबासाहेबांचे महान कार्य शक्य झाले नसते’
पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार दादाराव लहाने यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी माता रमाईंच्या अतुलनीय त्यागाचा गौरव केला.
“रमाईंच्या अथांग त्यागाशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडू शकले नसते,” असे सांगताना त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून स्वतःचे दुःख मनात दडवून ठेवणाऱ्या रमाईंच्या त्यागाची आठवण करून दिली. रमाईंचे जीवन म्हणजे त्याग,संयम,संघर्ष आणि समर्पणाचा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
रमाईंचा आदर्श प्रत्येक महिलेने घ्यावा
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी माता रमाईंच्या कणखरपणा,त्याग आणि दृढनिश्चयाचा गौरव केला. बाबासाहेबांच्या जीवनकार्याच्या उभारणीत रमाईंचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत आजच्या महिला व मुलींनी माता रमाईंच्या जीवनाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उषाताई विकास बोर्डे यांनी श्रावस्ती पौर्णिमेचे महत्त्व विशद केले. सुख-समृद्धीचा उपयोग केवळ भौतिक उपभोगासाठी न करता सदाचरण,ज्ञान आणि पुण्यकर्मासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दादाराव लहाने,भाई राजूभाऊ मगरे,पत्रकार विजय खरात,बाबुराव साळवे,श्रीकिसन गायकवाड,उषाताई विकास बोर्डे,समता सैनिक दलाचे कमांडर बबन खरात,धनंजय गायकवाड,किरण मगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास बोर्डे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबादास मोरे,संदीप मोरे,दीपक मोकळे,उद्धव भिसे,मिलिंद मोरे,विजय मोरे,सिद्धार्थ मोरे,रतन निकाळजे,नितेश मोरे,संदीप गवई,भीमराव मोरे,राहुल जाधव,विष्णू कांबळे,रमेश काकडे,विकास निकाळजे,अनिल भिसे,भारत मोरे,पंडित मोरे,ऋतिक मोरे,समाधान मोरे,गजानन भिसे तसेच पापळ येथील सर्व बौद्ध उपासक-उपासिका व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
पापळमध्ये उमटला ‘जयभीम-जय बुद्ध’चा निनाद
माता रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाने पापळच्या सामाजिक व धम्म चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, रमाईंच्या त्यागाची प्रेरणा आणि बुद्धाच्या धम्माचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या सोहळ्यातून व्यक्त झाला.



