जाफ्राबाद-छत्रपती संभाजीनगर एसटी सेवा सुरू; पाठपुराव्याला यश

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
जाफ्राबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, स्वातंत्र्यानंतर प्रथमच जाफ्राबाद-छत्रपती संभाजीनगर दरम्यान माहोरा बरंजळा साबळे नळणी-जवखेडा ठोंबरे-केदारखेडा-राजूर-दाभाडी-तळेगाव फुलंब्री मार्गे नियमित एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन तालुका उपप्रमुख अर्जुन पाटील ठोंबरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या मार्गावरील माहोरा, वरूड, पिंपळगाव कड, बरंजळा साबळे, नळणी, जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, राजूर, दाभाडी, तळेगाव आणि फुलंब्री परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीअभावी शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय कामकाज तसेच दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नासाठी अर्जुन पाटील ठोंबरे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयापासून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. विविध निवेदने, अधिकाऱ्यांच्या भेटी, ग्रामसभांचे ठराव, रस्ता पाहणी, अंतिम सर्वेक्षण आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिवहन प्रशासनाने ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य गर्ग परिवहन महामंडळ या बससेवेमुळे ग्रामीण भागाचा थेट संपर्क छत्रपती संभाजीनगर शहराशी जोडला गेला असून विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बससेवा सुरू झाल्यानंतर जवखेडा ठोंबरे येथे चालक एस. एस. हिवाळे आणि वाहक सतीश बदर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी बसचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण ठोंबरे, श्रीनिवास काबरा, शेषराव ठोंबरे, विलास मेथे, परमेश्वर ठोंबरे, अॅड. ललित ठोंबरे, बालाप्रसाद ठोंबरे, साहेबराव ठोंबरे, भीमराव घोडे, रावसाहेब डकले, राजू ठोंबरे, गणेश ठोंबरे, तुषार चौधरी, महेश कोलते, ज्ञानेश्वर ठोंबरे, बाबुराव ठोंबरे, अण्णा ठोंबरे, मोहन वाघ, नामदेव काळे, नंदू मोरे, रमेश मोरे, सादिक पठाण, शिवाजी साठे यांच्यासह महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बससेवा नियमित सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली.



