इतिहास महाराष्ट्राचा… बालकलाकारांच्या कलेतून उलगडणार!
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.28
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न बालरंगभूमी परिषद, जालना शाखेच्या वतीने आयोजित इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या राज्यस्तरीय महोत्सवाची जालना जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६* रोजी जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरी – दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या भूमीला शौर्य, त्याग, न्याय आणि सुशासनाचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान व जिज्ञासा निर्माण व्हावी तसेच बालकलाकारांना आपल्या अभिनय कौशल्याचे हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. यंदाच्या महोत्सवाचा मुख्य विषय लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. त्यांच्या पराक्रम, न्यायप्रियता, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, शिक्षणविषयक दूरदृष्टी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्यातील विविध प्रसंगांचे प्रभावी नाट्यरूप सादरीकरण स्पर्धकांकडून सादर करण्यात येणार आहे. या महोत्सवात *एकपात्री अभिनय, नाट्यछटा, स्वगत तसेच समूह नाट्य सादरीकरण* अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे – एकल गट क्र. १ : इयत्ता १ ली ते ५ वी एकल गट क्र. २ :इयत्ता ६ वी ते १० वी समूह गट क्र. ३ : इयत्ता १ ली ते १० वी एकल सादरीकरणासाठी ३ ते ५ मिनिटे, तर समूह सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. जालना शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक, शिक्षक आणि बालकलाकारांनी या राज्यस्तरीय महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास रंगभूमीवर जिवंत करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, जालना शाखेच्या अध्यक्षा वैशाली शालिग्राम दाभाडे यांनी केले आहे.



