राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जालन्यात सामाजिक न्यायदिन उत्साहात साजरा समता दिंडी, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव आणि व्यसनमुक्तीची शपथ
जालना/प्रतिनिधी,दि.26
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी सामाजिक न्यायदिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजकल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक न्याय, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नूतन वसाहत येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनातील सांस्कृतिक सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक करताना सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) डॉ. अनिता राठोड यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दुर्बल, वंचित आणि पीडित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी घेतलेले निर्णय आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीचा त्यांचा दृष्टिकोन आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचा उल्लेख करत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. भावसार (समाजकार्य महाविद्यालय, रामनगर) यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. जात, धर्म, पंथ आणि वर्णभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यामुळे सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट झाली आणि त्याच विचारांचा वारसा पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे पुढे नेल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी समीक्षा गायकवाड हिला 25 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच मुलींची शासकीय निवासी शाळेतील प्राची झिने आणि यशवंत महाविद्यालय, धावडा येथील रचना वाघमारे या विद्यार्थिनींना शाळेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, 26 जून हा आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन असल्याने नशामुक्त भारत अभियानांतर्गत 17 ते 26 जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या नशामुक्त सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानिमित्त उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन समाजात व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीपगिरी, मुख्याध्यापक, शासकीय निवासी शाळा, बदनापूर यांनी केले. वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गणेश अंबोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन विशेष अधिकारी (शासकीय निवासी शाळा) स्नेहल मोदाळे यांनी केले. या कार्यक्रमास समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बार्टीचे प्रतिनिधी, क्रिस्टल व बी.व्ही.जी. कर्मचारी, समतादूत, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेृत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




