टेंभुर्णी–कुंभारझरी रस्त्याची दयनीय अवस्था; ‘अपघात झाल्यावरच जाग येणार का?

टेंभुर्णी/प्रतिनिधी,दि.17
कुंभारझरी रस्त्याची बिकट अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष? नागरिकांमध्ये संताप” “अरुंद रस्त्यामुळे आत्तापर्यंत अनेक जीवघेणे अपघात” (दत्ता देशमुख ) टेंभुर्णी–कुंभाझरी परिसरातील महत्त्वाचा संपर्क रस्ता आज अत्यंत दयनीय अवस्थेत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणे बनले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, अरुंद उखडलेला डांबरी रस्ता आणि पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते; मात्र काही दिवसांतच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब होतो. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होऊनही नागरिकांना चांगला रस्ता मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, शेतमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ प्रवास करतात. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटनाही स्थानिकांकडून सांगितल्या जात आहेत. नागरिकांचा सवाल असा आहे की, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर होतो तरी काम का होत नाही? सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? टेंभुर्णी–कुंभारझरी मार्गाची तातडीने पाहणी करून अरुंद रस्त्याचे दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




