प्राणी व पशु पक्षांसाठी, झाडावर, जमिनीवर पाणी साठवण करा — दुर्गेश बनकर.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.26
दिवसेंदिवस उन्हाचा ताप वाढत चालला आहे. दुपारच्या वेळेस माणूस सुद्धा घराबाहेर पडायला घाबरतो, तर छोट्या पक्ष्यांची अवस्था काय होत असेल याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. पाण्याअभावी अनेक पक्षी जीव गमावत आहेत. झाडं कमी झाली, पाणवठे आटले आणि आता हे मुक्या जीवांचं जगणं कठीण होत चाललं आहे. याच गोष्टीची जाणीव ठेवत United Global Federation India मार्फत वेळोवेळी पक्षांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत असते. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याचा उपक्रम सध्या सुरू असून अनेक सामाजिक कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत. टेंभुर्णी शहर येथे देखील सेवानिवृत्त मा. मुख्यधापक रुस्तुम बोर्डे सर आणि दुर्गेश बनकर यांच्या पुढाकारातून पक्षांसाठी विविध ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली. उन्हामुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांना थोडासा आधार मिळावा आणि समाजामध्ये देखील याबाबत जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. “माणसाला तहान लागली तर तो बोलतो… पण पक्षी काही बोलू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या गरजेची जाणीव आपण स्वतः ठेवली पाहिजे.” सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या घरासमोर, गच्चीवर, शेतात, दुकानाजवळ किंवा झाडाखाली एक तरी पाण्याचं भांडं ठेवावं. दररोज त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं. छोटासा हा प्रयत्न अनेक पक्ष्यांसाठी जीवदान ठरू शकतो. निसर्ग आपल्यासाठी खूप काही देतो, आता त्याच्यासाठी आपण थोडंसं करणं हीच खरी माणुसकी आहे.


