ग्रामविकास अधिकारी वैभव पाटलांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा बीडीओंवर कारवाई!
सीईओ नेहा भोसलेंचा खालापूर पंचायत समितीला दणका

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
खालापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केगांव येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्यावर शासकीय निधीचा अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले आहेत. यासोबतच, आदेश देऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून सुधागड येथील नवघर ग्रामपंचायतीत हजर करण्याचे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे निर्देश खालापूरच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांनी केगांव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामनिधीतून वसूल केलेली रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता स्वतः परस्पर खर्च केली तसेच ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजांमध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत १ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत संतप्त पडसाद उमटले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी गट विकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आदेशात स्पष्ट बजावले आहे की, वैभव पाटील यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि तसा अहवाल तात्काळ जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा. जर या आदेशाचे विहित मुदतीत पालन झाले नाही, तर गट विकास अधिकाऱ्यांवरही ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९’ मधील नियम १० अन्वये शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, असा सज्जड दमही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.




