टेंभुर्णीचा अर्जुनची भारतीय सैन्यात निवड युगंधर प्रतिष्ठानकडून सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6
सेवा परमो धर्म हा मंत्र घेऊन टेंभुर्णीचा अर्जुन पुंजाराम जोशी भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे. ही बातमी गावात समजताच एकच जल्लोष झाला. युगंधर प्रतिष्ठानने कसलाही वेळ न दवडता थेट अर्जुनच्या दारात जाऊन ढोल-ताशांच्या गजरात त्याचा सत्कार घडवून आणला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गावकऱ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात अर्जुनचा फौजी अवतार टेंभुर्णीकरांनी डोळे भरून पाहिला. सत्काराला उत्तर देताना अर्जुनचे वडील पुंजाराम जोशी यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. माझं जे राहिलं, ते माझ्या पोरानं केलं, आता माझा अर्जुन फक्त जोशींचा नाही, तर पूर्ण हिंदुस्थानचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सकाळी पाच वाजता उठून धावणे, व्यायाम आणि अभ्यास अशी अर्जुनची दिनचर्या गेली….
——————————————————————–
गावचे ऋण फेडण्याची वेळ “गावच्या मातीचे ऋण फेडायची वेळ आली आहे. सीमेवर उभा राहून जेव्हा भारत माता की जय बोलेन, तेव्हा टेंभुर्णीचे नाव आठवेल. हे यश माझे एकट्याचे नाही, तर माझ्या मित्रांचे, गुरुजींचे आणि या मातीचे आहे.” – अर्जुन जोशी, भारतीय सैनिक ……तीन वर्षे ठरलेली होती. त्याला मोबाईल गेम आणि रीलचे वेड नव्हते, फक्त वर्दी अंगावर चढवण्याचा ध्यास होता, असे त्याचा मित्र सुमित जोशी याने सांगितले. आजकालची तरुण मुले नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे धावतात, पण अर्जुनने देशासाठी धावण्याचा निर्णय घेतला. हा सत्कार फक्त अर्जुनचा नाही, तर टेंभुर्णीच्या संस्कारांचा आहे, अशी भावना युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी व्यक्त केली. या सत्काराला सुनील जोशी, शिवाजी जोशी, आनंद आढावे, लव जोशी, विशाल पैठणे, तानाजी जोशी, ज्ञानेश्वर मैद यांच्यासह शेकडो ग्रामस्थ हजर होते. आपला अर्जुन आता फौजी अर्जुन झाला, हीच भावना प्रत्येकाच्या तोंडी होती.

