खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
ढिसाळ नियोजनाबद्दल शेतकरी आणि लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली नाराजी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.उरण तालुक्यातील खोपटे प्राथमिक शाळेत झालेला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किसन जावळे, पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील, पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील, प्रारंभी अविनाश गावंड, माजी सरपंच विशाखा ठाकूर, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी उरण तालुक्यातील मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तारापोरवाला सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र, मुंबईचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. भरत यादव, रवींद्र बोंद्रे व उरण तालुका मत्स्यअधिकारी सुरेश बाऊलगावे आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की उत्तम नियोजन व्यवस्थापन केल्यास शेतीबरोबर मत्स्यशेतीतून चांगले उत्पन्न घेता येते. यापूर्वी कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्राला लाभलेला ७२० किमी चा समुद्रकिनारा हे एक वरदान आहे. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राला अन्य राज्यांच्या तुलनेत पुढे आणण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीतून अधिकाधिक उत्पादन केल्यास शेतकरी आर्थिक संपन्न होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारणवर, कृषी अधिकारी शुभम गटकर यांनी ३०० शेतकऱ्यांना मत्यसबीजाचे वाटप केले असल्याचे सांगितले. कृषी विभागाने कार्यक्रम घाईघाईत उरकला त्यामुळे शेतकरी आणी लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.या कार्यक्रमाची माहिती एक दिवस आधी शेतकऱ्यांना दिली तशीच ती रात्री उशिरा लोकप्रतिनिधींना दिल्याने इतक्या घाई गडबडीत कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करण्याची गरज नव्हती असे सांगत उपसभापती परेश ठाकूर तसेच पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. याबाबत पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ज्या शेतकऱ्यांसाठी आपण प्रशिक्षण आणि मत्स्यबीज वाटप कार्यक्रम आयोजीत करतो त्या शेतकऱ्यांना वेळेत माहिती दिली नाही. तज्ञांचे प्रशिक्षणही १० मिनिटात उरकले. असे घाई घाईने कार्यक्रम घेऊन काय साध्य होणार आहे. तालुक्यात पुन्हा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सुचना कृषी विभागाला केली.




