भवरोग घालविण्यासाठी ब्रम्हरसाचा काढा घ्यावा – डॉ प्रमोद महाराज कुमावत

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
रोगराईचे दुःख घालविण्यासाठी औषधी घ्यावी लागते, पापाचे दुःख घालविण्यासाठी पुण्य करावे लागते परंतु अनंत जन्माचे भवरोगाचे दुःख घालविण्यासाठी केवळ ब्रह्म रसाचा काढा घ्यावा लागतो. हा ब्रह्म रसाचा काढा केवळ ब्रह्मनिष्ठ श्रोत्रीय व कृपाळू अशा सद्गुरूंकडेच मिळत असतो. आपण विवेक वैराग्यादी साधनांची जुळवाजुळव करून मुमुक्षु होऊन श्री गुरूंना शरण गेले पाहिजे व त्यांना ब्रह्म रसाचा काढा देण्याची विनंती केली पाहिजे तेव्हाच हा काढा मिळतो व आपण भवर रोगातून मुक्त होतो असे प्रतिपादन दुधना काळेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसरे कीर्तन पुष्प गुंफताना केले.
हभप ज्ञानेश्वर महाराज सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह सुरू आहे. गायनाचार्य हभप राजू महाराज गव्हाणे, ह भ प भागवत महाराज नागवे मृदंगाचार्य हभप अर्जुन महाराज नागवे यांच्या गायनाने व वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
पुढे बोलताना डॉ कुमावत महाराज म्हणाले की मानवी जीवन क्षणभंगुर असून या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हाच खरा पुरुषार्थ आहे. सद्गुरूंकडून ब्रह्म रसाचा काढा घेतल्यानंतर विठ्ठलाचे नामस्मरण करणे हेच खरे पथ्य आहे ही तर कुणाचेही नाव वाचेने घेऊ नये हे खूपच असून ते टाकले पाहिजे. कुणाचाही द्वेष मत्सर करता कामा नये कुणाची निंदा करता कामा नये कारण त्यामुळे अंतकरणांमध्ये दोष वाढवून मनुष्य परमात्म्यापासून दूर होतो. आपले अंतकरण शुद्ध करण्याचा सर्वात सुंदर व सोपा उपाय म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण करणे होय. सर्वात मोठी बाधा म्हणजे पंचमहाभूतांची बाधा होय. या जन्मामध्ये आपण परमात्म्याची प्राप्ती जर करून घेतली नाही तर पंचमहाभूतांची बाधा अर्थात पुन्हा जन्म मरण या अनर्थ परंपरेमध्ये पडावे लागते. सर्व संत म्हणतात किती वेळेस जन्माला यावे किती फजिती करून घ्यावे, या अनर्थ परंपरेला तोडणे संपवणे हेच खरे पुरुषार्थ आहे.
संत तुकाराम महाराजांच्या ब्रह्म रस घेई काढा | जेणे पीडा वारेल || पथ्यनाम विठोबाचे | आणिक वाचे न सेवी || भवरोग ऐसे जाय| आणिक काय क्षुल्लके || तुका म्हणे नव्हे बाधा| आणिक कदा भुतांची || या अभंगावर त्यांनी कीर्तन केले.
यावेळी हभप आप्पासाहेब मुळे महाराज, संदीप भांदरगे, ज्ञानदेव भांदरगे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




