गरीब दुबळ्यांची घरे पाडा आणि तिथे जाऊन नुसतेच रडा! याच्या शिवाय भोकरदन चे पुढारी काय करतात ? — बोरसे गुरुजी जालना जिल्हा सचिव

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5
आम आदमी पार्टी ” सासू मेली रडे सुनं! डोळे धुपणावर धरूनं!” जनते बद्दल जनतेच्या प्रश्नांबाबत भोकरदनच्या पुढार्यांना कोणतेही प्रेम नाही.फक्त पुर्णवेळ राजकारण अशी अवस्था भोकरदनच्या पुढार्यांची आहे. एखाद्या ठिकाणी अन्याय झाला तर फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी तिथे जातात. भाषणे ठोकून राजकारण करतात.परंतु त्या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळत नाही. न्याय कसा मिळणार! कारण अन्याय करणारे हेच असतात.उजेडात जरी हे वेगवेगळे दिसत असले तरी अंधारात यांचे शेपटं एकमेकाला बांधलेले आहेत. विकासाच्या नावाखाली पंचायत समितीच्या पाठीमागे असलेल्या परिसरातील गरीब लोकांची घरे पाडण्यात आली या अगोदरही दानवे जवखेडा या ठिकाणी कुंभाराची घरे पाडण्यात आली होती आणि पुढारी त्या ठिकाणी जाऊन ढसाढसा रडले होते. भाषणे ठोकली होती. पुढे काय झाले? त्यांना न्याय मिळाला का ? गुन्हेगाराला शिक्षा झाली का ? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. भोकरदन च्या पुढार्यांना फक्त राजकारण करायचे असून समाजाची घडी विस्कटून टाकायची आहे. ही त्यांची मनीषा असून भोळ्या भाबड्या जनतेच्या भरोशावर वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून राहणे आणि आपली आपल्या कुटुंबाची आणि आपल्या सोयऱ्या धायर्यांची व्यवस्था लावणे याच्या शिवाय या पुढाऱ्यांनी काहीच केलेलं नाही. निस्वार्थभाव, समाजसेवा,त्याग,प्रेम हे शब्द यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीत. यांच्यापेक्षा यांचेच यांच्यांच पक्षांचे कार्यकर्ते हुशार आहेत परंतु त्या कार्यकर्त्याला पुढे न येऊ देणे यासाठी त्यांना अवैध धंद्याला लावणे, दारूच्या व्यसनात अडकवणे, खोट्या केसेस करणे अशी लबाडी वर्षानुवर्ष चालू आहे. इकडे खेड्यापाड्यामध्ये शेतकरी उन्हातान्हामध्ये मिरचीची लागवड करत आहे. अनेक संकटाना तोंड देत आहेत. शेती उपयुक्त अनेक साहित्याचे भाव बाजारात वाढलेले आहेत यांना त्याच्याशी काही सोयर सुतक नाही. कोणत्याच कार्यालयामध्ये सामान्य जनतेचे काम सहज होत नाही. पैसे द्यावेच लागतात. त्या पैशांमध्येही यांची टक्केवारी ठरलेली असते. तालुक्यातील कोणताही धंदा करणारे दुकानदार असो वाईट मार्गाने पैसे कमावणारे असो त्यांना आपल्याच आधीपत्या खाली ठेवून त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचे काम हे लोक करतात. परंतु प्रत्यक्षात कोणाच्या पदरात काहीच पडू देत नाहीत. निवडणुका जिंकले किंवा हरले तरी नफ्यात असतात असं खेड्या पाड्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. सध्या भोकरदन मध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम भोकरदनच्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याने हाती घेतली आहे. राजकीय पुढारी मात्र सर्व काही मुख्याधिकाऱ्यावर ढकलून नामा निराळे झाले आहेत. म्हणजे ” मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली ” अशी अवस्था आहे. असे जर आहे तर पुन्हा त्या ठिकाणी जाऊन नक्राश्रू ढाळण्याची गरज काय ? नगरपरिषदे च्या मुख्याधिकाऱ्याला इतकी हिंमत आहे काय ? राजकीय पुढाऱ्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या पाठिंब्याशिवाय मुख्याधिकारी असे कामे करूच शकत नाही. घरे पाडण्यासाठी पाठिंबा द्यायचा आणि पुन्हा जनतेसमोर जाऊन रडायचे अशी दुटप्पी भूमिका बंद करा! कोणत्यातरी एका मार्गाने चाला ना ! जनतेला उल्लू बनवणे बंद करा.जनतेला सर्व कळतें परंतु पर्याय नाही. त्यामुळे या पुढार्यांना खात्री आहे की जे रुसतील ते आपल्याकडे येतील.त्यामुळे फक्त फोडा आणि झोडायची राजनीती संपूर्ण ठिकाणी हे लोक करत असतात. त्यामध्ये जनतेचा अतिशय तोटा असून यांच्या राजकारणाच्या पोळ्या मात्र शेकल्या जातात. सर्वच पुढाऱ्यांना आव्हान आहे की आपण जर या लोकांना न्याय देऊ शकत नसाल तर किमान अन्याय तरी करू नका! आणि अन्याय करत असाल तर त्या ठिकाणी रडण्यासाठी जाऊ नका! जनतेला देवाच्या भरोशावर सोडून द्या जनता पाहिल आपल काय करायचे ते. खरं म्हणजे जेवढा सज्जन, जेवढा त्यागी, जेवढा निस्वार्थि तेवढ्या मोठ्या पदावर ती व्यक्ती असली पाहिजे. परंतु सध्या उलटी परिस्थिती या लोकांनी करून ठेवली आहे जेवढा लबाड, जेवढा लुच्चा, जेवढा स्वार्थी ,जेवढा कपटी ,आणि जेवढा भ्रष्ट तेवढे मोठेपद त्याला मिळते आणि तो अन्याय करायला मोकळा होतो शेवटी जनतेच्या आता या सर्वगोष्टी लक्षात येत आहेत एक दिवस या सर्व पुढाऱ्यांना जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. भोकरदन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आणि पाठिंबा ही आहे की, आता अतिक्रमण काढण्याची मोहीम जर हातात घेतलेलीच आहे तर सरसकट गरीब असो श्रीमंत असो सामान्य जनतेतला असो किंवा मोठा पदाधिकारी असो सर्वांचेच 100 % अतिक्रमण काढा! आणि या भामट्या पुढार्यांनाही आमची विनंती आहे की,स्वतःहून तुम्ही केलेले नगरपरिषदेच्या करोडो रुपयांच्या जागेवरील अतिक्रमण काढून घ्या! तुमचे वाईट धंदे सोडा! नंतरच जनते जवळ जाऊन रडा! सामान्य नागरिकांनी दहा फुटात बांधलेली झोपडी यांना चालत नाही परंतु आणि अनेक एकरामध्ये अतिक्रमण करून बांधलेले यांचे बंगले चालतात कसे ? जर तुम्ही धुतले तांदूळ असाल तर तुमच्या जागेचे सर्व कागदपत्र सार्वजनिक करा आणि समजू द्या तुम्ही किती निस्वार्थी आहात ? एक मे रोजी एका पुढाऱ्याने भेटून मुख्याधिकाऱ्याला ही कार्यवाही करण्यास भाग पाडले.तर दुसरा पुढारी मुख्याधिकाऱ्याची मनमानी असून नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना न विचारता ही कार्यवाही केल्याचे जनतेला सांगत आहेत. निश्चितच हे पटण्यासारखे नाही. त्यामुळे या दोघांच्या राजकारणाला जनता कंटाळली असून हे ” दोन्ही पुढारी हटवा आणि कटकट मिटवा ” अशाप्रकारे जनतेमध्ये चर्चा आहे.




