रक्षाबंधनातून बंधुभावासोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीकy असलेला रक्षाबंधनाचा सण जालना येथील हिंदू समाज संस्था संचलित दनकै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात भारतीय परंपरेनुसार उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या विद्यार्थी बंधूंना तसेच शाळेतील शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या पवित्र बंधाची अनुभूती दिली. शिक्षकांना राखी बांधतानाचा प्रसंग सर्वांसाठी भावनिक ठरला. भारतीय संस्कृतीतील प्रेम, आपुलकी, स्नेह आणि परस्पर रक्षणाची भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांनी स्वरचित भावगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रीमती अनघा जोशी यांनीही रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी भावगीत सादर केले. या भावपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थिनींना पारंपरिक भेटवस्तूंऐवजी वृक्ष भेट देत अनोखा पर्यावरणपूरक संदेश दिला. “बहिणीच्या रक्षणासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले.
भारतीय संस्कृतीतील सण-परंपरांचे जतन करत त्यांना सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भावनिक, संस्कारक्षम आणि पर्यावरणपूरक वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



