धावडा येथे उन्हातही बालसंस्कार शिबिर संपन्न

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 8
सध्या जालना जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट असतानाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेले बाल आनंद महोत्सव व उन्हाळी संस्कार शिबिर यशस्वीपणे पार पाडणे हे अत्यंत कौतुकास्पद कार्य असल्याचे मत ग्रामीण साहित्यिक तथा केंद्रप्रमुख सुधाकर चिंधोटे यांनी व्यक्त केले. पी.एम. श्री जिल्हा परिषद प्रशाला, धावडा (ता. भोकरदन) येथे आयोजित संस्कार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संस्कार, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी दत्ता गवळी यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपकारांची जाणीव कायम ठेवावी, असे विचार मांडले. दि. ६ जून ते ९ जून दरम्यान सुरू असलेल्या या शिबिरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दोन्ही वक्त्यांनी विविध बालकवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. तसेच थोर महापुरुषांचे विचार अंगीकारून जीवन समृद्ध करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दशरथ बडगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक जे. ए. पठाण उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नारायण पाडळे, दिलीप तायडे, मुरलीधर पवार, अनया लव्हाणे, जुबेरशहा पठाण, रमेश सिनकर, बाल आनंदोत्सव उन्हाळी शिबिर गजानन फदाट, विजय पाटील, सपकाळ सर व पैठणे मामा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय सपकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन नारायण पाडळे यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे ३५० विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आयोजित या संस्कार शिबिराचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.



