भारतीय ज्ञान परंपरा कीर्तनामुळे तळागाळापर्यंत पोहचली – डॉ न. ब. कदम

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 21
भारत या शब्दामध्ये भा शब्दाचा अर्थ ज्ञानप्रभा आणि त्यात रत म्हणजे रममाण होणे तो भारत होय. सतत ज्ञानात रममाण होणारा देश म्हणजे भारत, या देशात सर्वोच्च ज्ञानाची मोठी परंपरा आहे त्यामुळे जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक सर्व ज्ञान वेदादी ग्रंथातून मांडून ठेवले आहे. मात्र त्यावर आज विपुल संशोधन होणे आवश्यक आहे. तेच वैदिक ज्ञान संत परंपरेतील साहित्यात उतरले आहे व ते कीर्तनकारांनी तळागाळापर्यंत पोहचवले आहे व आजही पोहचावीत आहेत असे प्रतिपादन ‘भारतीय ज्ञान परंपरा व समृद्ध कीर्तन परंपरा’ या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ न.ब.कदम यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ अश्विन रांजणीकर होते तर या चर्चासत्राचे उद्घाटन आनंदगड येथील हभप डॉ भगवान बाबांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती श्रीमती दानकुवर हिंदी कन्या विद्यालय समितीचे अध्यक्ष मा. महेंद्रकुमारजी गुप्ता, सहसचिव नरेशजी अग्रवाल, कोषाध्यक्ष संजयजी अग्रवाल, संचालक अजय जी अग्रवाल, प्रशासकीय अधिकारी डॉ. विद्या पटवारी, प्र.प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जितेंद्र अहिरराव यांनी केले. या सत्राचे सूत्रसंचालन हभप झगरे गुरूजी वाकदकर यांनी केले तर आभार डॉ वासुदेव उगले यांनी मानले.
आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातून पंढरपूरला जाणारी एक शिस्तबद्ध वारी हभप सोनवणे गुरुजींच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघत असते यावर्षी शासनाने दखल घेऊन या दिंडीला स्वच्छतेची उत्कृष्ट दिंडी म्हणून द्वितीय पारितोषिक दिले आहे हा जालना जिल्ह्याचा गौरव असून या चर्चासत्रात सोनुने गुरुजींचा भव्य सत्कार हभप डॉ भगवान बाबा आनंदगडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दुपारच्या सत्रामध्ये ” किर्तन परंपरा वर्तमान काळातील प्रभाव उपयुक्तता व बदलते स्वरूप” या विषयावर चर्चासत्र झाले असून या चर्चासत्राचे अध्यक्ष ह भ प डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर हे होते. सर्वोच्च उपनिषदांचे तत्त्वज्ञान संतसाहित्यात आले असून कीर्तनकारांनी त्या ग्रंथांचा अभ्यास करून कीर्तन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या चर्चासत्रात डॉ राम रौनेकर, डॉ अशोक देशमाने, डॉ प्रमोद कुमावत, डॉ ऋषीबाबा शिंदे यांनी विषयाला धरून आपले मत व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन हभप नारायण महाराज पिंपळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आरंभी प्रा रामेश्वर नरवडे, पांडुरंग महाराज वाघमारे यांनी भजन सादर केले तर समारोपामध्ये प्रशांत जाधव व भक्तीताई रणनवरे यांच्या सुश्राव्य पसायदानाने सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातून मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती दानकुवर महिला महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती महाजन, पार्वती देशमुख, डॉ.वासुदेव उगले व प्राध्यापक मंडळींनी परिश्रम घेतले.
