तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप; ई-पॉस यंत्रणेबाबत अडचणी दूर करण्यासाठी निर्णय
जालना/प्रतिनिधी,दि.2
आगामी पावसाळा व त्यानंतरच्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाभार्थ्यांना धान्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीतील अन्नधान्य आगाऊ उचल करून लाभार्थ्यांना 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात कार्यवाही सुरू आहे.
मात्र, विविध घटकांतील कार्यात्मक विलंबामुळे राज्यात तीन महिन्यांचे अन्नधान्य ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांना एकत्रित वाटप करताना अडचणी निर्माण होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. त्यामुळे माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीतील अन्नधान्याचे एकत्रित वाटप न करता, दरमहा स्वतंत्रपणे वितरणास मान्यता देण्याची विनंती केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. या विनंतीची दखल घेत केंद्र शासनाने 22 जुलै 2026 रोजीच्या पत्राद्वारे संबंधित कालावधीत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक त्या मुदतीत दरमहा अन्नधान्य वितरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करताना ई-पॉस प्रणालीतील अडचणी टाळण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील संपूर्ण अन्नधान्य महिनानिहाय गोदामांमध्ये पोहोचवून, तेथून थेट वाहतूक करून रास्तभाव दुकानांमध्ये वितरित करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.



