pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रवासी वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ योजनेत नोंदणीचे आवाहन

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.3

राज्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पूर्वीच्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’चे नाव बदलून आता ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे करण्यात आले असून, मंडळाच्या नियमावलीतही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या सुधारित योजनेमुळे मंडळाच्या सदस्यत्वाची व्याप्ती वाढली असून, आता परवानाधारक बॅजधारक सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांना या मंडळाचे सदस्य होता येणार आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कल्याणकारी निधी निर्माण करण्यात येणार आहे. या निधीतून पात्र नोंदणीकृत चालकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच Ola, Uber आणि तत्सम ऑनलाइन अॅप किंवा ॲग्रीगेटरच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक बुकिंग करणाऱ्या कंपन्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक राईडवर आकारण्यात येणारी कल्याणकारी रक्कम या निधीत जमा होणार असून, त्याचा उपयोग चालकांच्या हितासाठी केला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क भरून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे.

नोंदणीसाठी चालकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वैध वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), प्रवासी वाहन चालविण्यासाठी आवश्यक बॅजची माहिती तसेच अर्जामध्ये मागविण्यात आलेली इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित चालकाला मंडळाचे ओळखपत्र (Identity Card) दिले जाणार असून, त्याच्या आधारे शासनामार्फत आणि मंडळाकडून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

जालना जिल्ह्यातील चालकांना विशेष आवाहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच इतर सर्व पात्र प्रवासी वाहन चालकांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः Ola, Uber व इतर ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवांशी संलग्न असलेल्या चालकांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने नोंदणी करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे