फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या, माळी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 4
आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या उभयतांना संयुक्त मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. अविनाश ठाकरे हे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आणि केंद्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी महोत्सव उच्चस्तरीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, स्त्री-साक्षरता, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी फुले दाम्पत्याने केलेले ऐतिहासिक कार्य पाहता त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविणे ही काळाची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

