टेंभुर्णी परिसरातील नांदखेडा येथे खरीप हंगाम शेतकरी मार्गदर्शन सभा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.12
जाफ्राबाद तालुक्यातील नांदखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक नियोजन, हवामानातील बदल आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत या सभेत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हवामान बदलाला सामोरे जात शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचा संदेश यातून देण्यात आला.
एल निनोचा संभाव्य प्रभाव
उप कृषी अधिकारी संतोष गिरी यांनी एल निनोच्या संभाव्य प्रभावावर प्रकाश टाकला. कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांच्या वाणांची निवड, टोकन आणि बीबीएफ पद्धतीने लागवड, तसेच उताराला आडवी पेरणी करण्याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याशिवाय कमी पाण्यावर आणि पावसाच्या
ताणात तग धरणाऱ्या पिकांची लागवड कशी करावी, याचीही माहिती दिली.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बियाण्यांच्या पावत्या, पिशव्या आणि टॅग पीक काढणीपर्यंत जतन करून ठेवण्याचे महत्त्व यावेळी समजावून सांगण्यात आले. सहाय्यक कृषी
अधिकारी निवृत्ती भगत यांनी बीजप्रक्रिया आणि बियाण्यांची उगवणक्षमता चाचणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तूर, मूग आणि उडीद पिकांसाठी उपलब्ध असलेल्या सीड किट योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांना महाविस्तार अॅपचे
फायदे आणि उपयोगही समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच बाबासाहेब सवडे, समाधान सवडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त शेती पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.




