महिला विषयक कायदे जनजागृती व्याख्यान संपन्न

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 21
जाफ्राबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 20 ऑगस्ट, 2026 रोजी महिला विकास कक्ष (अंतर्गत तक्रार समिती) व सखी सावित्री समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला विषयक कायदे जनजागृती व्याख्यान” कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. श्रीमती. सिनगारे एस. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रो. डॉ. मेढे एस. एल. हे होते. प्रमुख वक्ते म्हणून विधीज्ञ श्री. वरूण देशपांडे, दिवाणी व फौजदारी न्यायालय, जाफ्राबाद आणि विधीज्ञ श्रीमती. सुषमा मोरे (भिसे) दिवाणी व फौजदारी न्यायालय, जाफ्राबाद लाभले होते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. येवले बी. ए. हे विशेष उपस्थिती म्हणून व्यासपीठावर स्थानापन्न होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रथम प्रमुख व्याख्याते विधीज्ञ श्री. वरूण देशपांडे यांनी “महिला सक्षमीकरण आणि महिलांचे घटनात्मक अधिकार” या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील महिलांचे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे आणि महिलांच्या समानतेचे व संरक्षणाचे अधिकार विषयक माहिती न्यायालयातील विविध खटलांच्या उदाहरणासह विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले, आणि महिलांमध्ये स्वावलंब आर्थिक व मानसिक आत्मनिर्भरता आणि सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सत्य व वास्तव विषय दृष्टिकोन आत्मसात करून सर्वांगीण विकास करावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या द्वितीय व्याख्याते विधीज्ञ श्रीमती. सुषमा मोरे यांनी “महिला विषयक विविध कायदे” याविषयी मार्गदर्शन करताना कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, कामाच्या ठिकाणावरील लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 (POSH 2013), हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, PCPNDT कायदा 1994, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971, मातृत्व लाभ कायदा 1961 आणि हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच महिला ही सहनशीलता, धैर्य, आणि त्यागाचे प्रतीक असून कुटुंबापासून ते देशाच्या प्रगतीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे, अशाप्रसंगी महिलांमध्ये कायद्याविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे मत विधीज्ञ श्रीमती. सुषमा मोरे यांनी मांडले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपप्राचार्य प्रो. डॉ. मेढे एस. एल. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधान हे जागतिक दर्जा प्राप्त केलेले असून संविधानाचा स्वीकार 1950 मध्ये करण्यात आला. त्यामुळे भारतात सशक्त कायदेशीर चौकट तयार झाली, या चौकटीची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होण्यासाठी सर्वांनी सचोटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आणि विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले हक्क आणि कायदे विषयी जागरूक राहण्यासाठी आपल्या संविधानाचा सखोल असा अभ्यास करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख व्याख्याते यांची ओळख प्रा. मनीषा मोहिते मोहिते यांनी करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनंदा सोनूने यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सारिका जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी सुरेल असे स्वागत गीत कु.आरती इंगळे, कु. भारती आढावे आणि कु. जयश्री जाधव या विद्यार्थिनींनी गायले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महिला विकास कक्ष समन्वयक प्रा.श्रीमती सरिता मणियार, प्रा.श्रीमती. निर्मला खांडेभराड, श्रीमती. नयना चौधरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
